(दापोली)
तालुक्यातील विसापूर येथील समशेट अली नगर मोहल्ल्यात गोवंश जनावरे कत्तल करण्यासाठी बंदिस्त ठेवल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी गोठ्यात व जंगललगतच्या परिसरात जखडून ठेवलेले एकूण २० गोवंश जनावरे ताब्यात घेतले असून, तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे व अपर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. त्यांनी जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तल प्रतिबंधासाठी कठोर पावले उचलण्याचे आदेश दिले होते. ७ जून रोजी दापोली पोलिसांनी प्राप्त माहितीची खातरजमा करून समशेट अली नगर मोहल्ल्यातील एका घरात छापा टाकला. यावेळी बैल, गायी व वासरे बंदिस्त अवस्थेत आढळून आली. पुढील तपासात पोलिसांनी घरालगत असलेल्या जंगलयुक्त भागाचीही पाहणी केली. तेथेही ३ गोवंश जनावरे कत्तलीसाठी बांधून ठेवलेले आढळून आले.
पोलिसांनी १ बैल, १५ गायी व ४ वासरे अशा एकूण २० जनावरांची सुटका करून त्यांना जवळच्या गोशाळेत हलवले आहे. या प्रकरणी हानीफ शेख अली मालवणकर याला पोलिसांनी अटक केली असून, त्याचा मुलगा आणि भाऊ यांच्यासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई दापोली पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक विवेक अहिरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव, महेश पाटील, हेमराज निर्मळ, मिलिंद चव्हाण, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली.