(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात अमली पदार्थांच्या विरोधात पोलिस प्रशासनाने सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत रत्नागिरी शहर पोलिसांनी मिरकर वाडा परिसरात मोठी कारवाई करत एक इसम गांजासहित ताब्यात घेतला आहे. या कारवाईत तब्बल ₹30,000 किमतीचा 716 ग्रॅम वजनाचा “गांजा” हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे.
दिनांक 5 जून 2025 रोजी रात्री 9.04 वाजता रत्नागिरी शहर पोलीस पथक मिरकर वाडा येथील पांढरा समुद्र परिसरात गस्त घालत असताना, पाण्याच्या टाकीच्या उत्तरेस सुमारे 50 मीटर अंतरावर एका मोकळ्या मैदानात एक इसम संशयास्पद हालचाली करताना आढळून आला. पोलिसांनी त्याला थांबवून नाव विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच योग्य पोलीस बळाचा वापर करून त्याला ताब्यात घेतले.
अधिक चौकशीत आरोपीने आपले नाव रोहित राजेंद्र चव्हाण (वय 35 वर्षे), रा. घर नं. 1391, आंबेशेत, रत्नागिरी असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे एका पांढऱ्या पिशवीत एकूण 17 पारदर्शक प्लास्टिक पिशव्यांमध्ये गांजासदृश्य काळसर-हिरवट वनस्पती (पाने, फुले, काड्या, बिया) आढळून आली.
पोलिसांनी रोहित चव्हाण यास ताब्यात घेऊन त्याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 238/2025 अन्वये एन.डी.पी.एस. अॅक्टच्या कलम 8(क), 20(ब)(ii)(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. सतीश शिवरकर यांच्या नेतृत्वाखाली पो.उ.नि. श्याम आरमाळकर, स.पो.फौ. दीपक साळवी, पोहवा अरुण चाळके, अमोल भोसले, आशीष भालेकर, पंकज पडेलकर व पो.कॉ. अमित पालवे यांनी सहभाग घेतला.