( जैतापूर / राजन लाड )
समाजात शांतता आणि सलोखा नांदण्यासाठी आपल्या सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन नाटे सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी केले.
राजापूर तालुक्यातील नाटे सागरी पोलीस ठाणे येथे बुधवार, दिनांक 4 मे रोजी सामाजिक सलोखा समितीची पहिली सभा पार पडली. या वेळी बोलताना पोलीस निरीक्षक खेडकर यांनी सांगितले की, जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी सर्वांना या समितीच्या माध्यमातून एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
जिल्ह्यात सध्या सामाजिक सलोख्याचे चांगले वातावरण आहे आणि ते आणखी दृढ व्हावे, यासाठी प्रत्येक तालुकास्तरावर अशा समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन लोकाभिमुख आणि संवादप्रधान व्हावे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
येत्या सण-उत्सव काळात कुठलीही अनुचित घटना घडू नये, यासाठी शांततेच्या वातावरणात हे कार्यक्रम पार पाडणे महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने सामाजिक सलोखा समितीच्या माध्यमातून गावोगावी लोकांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
सभेत उपस्थितांनी गावांमध्ये सुरू असलेले अवैध धंदे, मादक व अमली पदार्थांचे सेवन व विक्री यांविरोधात ठोस पावले उचलण्याचे आणि जनजागृतीद्वारे समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे मत व्यक्त केले.
या पहिल्या सभेस नाटेचे सरपंच संदीप बांदकर, मलिक गडकरी, संतोष चव्हाण, जलाल काझी, शादत हबीब, ओमकार पेडणेकर, समीक्षा कुवेस्कर, नौशाद धालवेलकर, पत्रकार राजन लाड, सुनील रूमडे, तौकीर सोलकर, संजय नाटेकर, प्रमोद मंचेकर, शफी वाडकर, नदीम तमके, नुरुद्दीन हुश्ये, समीर सोलकर, रज्जाक हुश्ये, सुवर्णा गावकर, सिकंदर हातवडकर, आदिल म्हसकर, मजीद सायेकर आदी मान्यवर व सलोखा समितीचे सदस्य उपस्थित होते.