(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्ह्यात गोवंश वाहतूक व कत्तलीस प्रतिबंध करण्यासाठी पोलिस प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेंतर्गत रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याने उल्लेखनीय कारवाई केली आहे. 5 जून रोजी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास खानू पेट्रोल पंपाजवळ मुंबई-गोवा महामार्गावर एका संशयास्पद टेम्पोला अडवून पोलिसांनी तपासणी केली असता त्यामध्ये पाच गोवंशीय बैल अमानुष पद्धतीने बांधलेले आढळून आले.
टेम्पो थांबवून वाहनाची तपासणी केली असता, बैलांना कोणत्याही प्रकारची वैद्यकीय तपासणी न करता तसेच अन्न-पाण्याविना कत्तलीसाठी नेत असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी राहुल आनंदा सावंत (वय 23) व ऋषिकेश आनंदा सावंत (वय 26), दोघेही रा. बोरपाडळे, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर यांना ताब्यात घेतले. सदर वाहन – टाटा 407 टेम्पो (क्रमांक MH-14-HU-5406) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ₹6 लाख इतकी आहे. तसेच या टेम्पोतून वाहतूक केलेल्या पाच बैलांची (किंमत सुमारे ₹38,000) सुटका करण्यात आली आहे.
या प्रकरणी संबंधितांवर प्राण्यांच्या छळ प्रतिबंधक अधिनियम 1960, महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 आणि केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 108/2025 नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र यादव व त्यांच्या पथकाने केली. या पथकात पो.उ.नि. श्री. चव्हाण, सपोफौ श्री. सावंत, श्री. कांबळे, मपोहवा श्रीमती सावंतदेसाई व पोशि श्री. पाटील यांचा समावेश होता.
पोलिस प्रशासनाकडून अशा प्रकारच्या बेकायदेशीर गोवंश वाहतुकीस आळा घालण्यासाठी प्रयत्न सुरू असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींची माहिती पोलिसांना तत्काळ कळवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.