(मुंबई)
राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना जून २०२५ पासून मूळ वेतनावर ४६ टक्क्यांऐवजी ५३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय योजनांचा पर्याय, अपघाती विमा कवच, आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना मोफत प्रवास पासाचा कालावधी वाढवण्याचे महत्त्वपूर्ण निर्णयही जाहीर करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृहात एसटी महामंडळाच्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी हे निर्णय जाहीर केले. यावेळी त्यांनी सांगितले की, सामान्य जनतेसाठी जीवनवाहिनी असलेल्या एसटी बस सेवेच्या माध्यमातून नागरिकांना दर्जेदार सेवा मिळाली पाहिजे. केवळ बसेस नव्हे तर बसस्थानकांनाही स्वच्छ ठेवण्यावर भर देत, स्वच्छतागृहे आणि विश्रांतीगृहे देखील स्वच्छ असावीत यावर त्यांनी भर दिला.
महत्त्वाचे निर्णय:
महागाई भत्ता वाढ:
जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर ५३ टक्के महागाई भत्ता लागू. याआधी ४६ टक्के दराने भत्ता दिला जात होता. थकबाकीबाबत निधीच्या उपलब्धतेनुसार निर्णय घेण्यात येणार.
वैद्यकीय योजना पर्याय:
कर्मचाऱ्यांना महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा धर्मवीर आनंद दिघे वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना यांपैकी एक योजना निवडण्याचा पर्याय. संयुक्त आरोग्य योजनेअंतर्गत ५ लाखांपर्यंत कॅशलेस वैद्यकीय सेवा उपलब्ध.
अपघाती विमा कवच:
कर्मचाऱ्यांसाठी १ कोटी रुपयांचे अपघाती विमा संरक्षण लागू.
निवृत्त कर्मचाऱ्यांना सुविधा:
मोफत प्रवास पासाचा कालावधी ९ महिन्यांवरून वाढवून १२ महिने करण्यात येणार.
शिंदे यांनी एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी कार्गो सेवा सुरू करण्यावर भर देण्याचेही आवाहन केले. बस स्थानकांचे रूपांतर आधुनिक “बस पोर्ट”मध्ये करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच, एसटीच्या तोट्याच्या व्यवस्थापनावर नव्याने अभ्यास करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. संघटनांच्या प्रतिनिधींनी विविध मागण्या मांडल्या असून इंधन बचतीसह उत्पन्नवाढीसाठी उपाययोजनांवरही चर्चा झाली.