(मुंबई)
कॅनरा बँकेने नुकताच एक महत्त्वपूर्ण आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. बँकेने त्यांच्या सर्व बचत खात्यांवरील किमान शिल्लक रक्कम ठेवण्याची अट पूर्णतः रद्द केली असून, याचा थेट फायदा लाखो ग्राहकांना होणार आहे. आजच्या काळात बहुतांश बँका त्यांच्या खातेदारांकडून ठराविक रक्कम शिल्लक स्वरूपात ठेवण्याची अट लादतात. ही रक्कम उपलब्ध नसल्यास, दंड आकारला जातो, जो अनेकदा अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी त्रासदायक ठरतो.
काय आहे बदल?
१ जून २०२५ पासून कॅनरा बँकेच्या सर्व बचत खाती, पगार खाती तसेच एनआरआय बचत खात्यांवर ही सुधारणा लागू करण्यात आली आहे. आता ग्राहकांना खात्यात काहीच रक्कम न ठेवता खाते सुरू ठेवण्याची मुभा मिळणार आहे. या निर्णयामुळे कॅनरा बँक ही सुविधा देणारी देशातील पहिली मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक ठरली आहे. यापूर्वी महानगर आणि शहरी शाखांसाठी २००० रुपये, अर्ध-शहरी भागांसाठी १००० रुपये आणि ग्रामीण भागांसाठी ५०० रुपये किमान शिल्लक रक्कम बंधनकारक होती. रक्कम अपुरी असताना ग्राहकांना सतत दंड भरावा लागत होता, त्यामुळे बँकिंग सेवा सर्वसामान्यांसाठी खर्चिक आणि अशक्य बनत होती.
या निर्णयाचा विद्यार्थ्यांना, वृद्ध नागरिकांना, अल्पवेतनधारकांना आणि ग्रामीण भागातील जनतेला सर्वाधिक फायदा होणार आहे. आता बँकेत खाते चालवण्यासाठी ठराविक रक्कम शिल्लक ठेवण्याची गरज उरणार नाही, यामुळे आर्थिक लवचिकता वाढेल आणि अधिक नागरिक बँकिंग सेवेकडे वळतील.
कॅनरा बँकेच्या या निर्णयामुळे नवीन ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. किमान शिल्लक रक्कमेच्या अटीमुळे अनेक लोक बँकिंगपासून दूर राहिले होते. आता ही अडचण दूर झाल्याने आर्थिक समावेशनाचा मार्ग अधिक सुकर होईल. कॅनरा बँकेचा हा निर्णय आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गासाठी मोठा दिलासा ठरू शकतो. बँकिंग सेवा अधिक सुलभ, लवचिक आणि सर्वसमावेशक करण्याच्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे.