(रत्नागिरी / प्रतिनिधी)
एस.टी. महामंडळाच्या सेवेतील प्रवाशांना लवकरच प्रदूषणमुक्त प्रवासाचा अनुभव मिळणार आहे. एस.टी.च्या ताफ्यात नव्याने ३० इलेक्ट्रिक बसेस (ई-बसेस) दाखल होणार असून, त्या जिल्ह्यातील रस्त्यांवर धावण्यासाठी सज्ज होत आहेत. या पार्श्वभूमीवर रत्नागिरी, खेड व दापोली आगारांमध्ये आवश्यक चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम सध्या महावितरणकडून युद्धपातळीवर सुरू आहे.
सध्या एस.टी. महामंडळाच्या रत्नागिरी जिल्ह्यात ७२० बसगाड्या सेवेत आहेत. त्यामध्ये ३४ शिवशाही, २६ स्लिपर आणि ४० सिटी बसचा समावेश आहे. याशिवाय, ४० बसेस भाडे तत्वावर घेतल्या आहेत. वाढत्या डिझेल किंमती आणि प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इलेक्ट्रिक बसेस ही एक शाश्वत पर्याय म्हणून पुढे येत आहेत. ई-बसेसमुळे दररोज होणाऱ्या लाखो रुपयांच्या इंधन खर्चात कपात होणार असून पर्यावरणाच्या दृष्टीनेही ही सकारात्मक पावले ठरतील.
ई-बसेस सुरू करण्यासाठी आवश्यक चार्जिंग सुविधा विकसित करण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे. रत्नागिरीतील माळनाका आगारात महावितरणने विजेची जोडणी देत चार्जिंग यंत्रणा उभारली असून, खेड आणि दापोलीतही अशीच कामे वेगाने सुरू आहेत. चार्जिंग यंत्रणा कार्यान्वित होताच या बसेस प्रत्यक्ष सेवेत दाखल होतील.
शासनाच्या महिलांसाठी व वयोवृद्धांसाठी राबवलेल्या सवलतीमुळे एस.टी. प्रवासाकडे प्रवाशांचा कल वाढत आहे. एमआयडीसीच्या सहकार्याने बसस्थानकांच्या आधुनिकीकरणाचीही प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे एस.टी. महामंडळाची सेवा अधिक सक्षम, आरामदायक आणि पर्यावरणपूरक होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या उपक्रमामुळे एस.टी. महामंडळाच्या तिजोरीला दिलासा मिळणार असून, प्रवाशांना स्वच्छ, शांत व आधुनिक प्रवासाचा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.