(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जल जीवन मिशन या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हा परिषद रत्नागिरी येथे सध्या कार्यरत असलेल्या श्रीमती उमा संतोष गमरे यांना ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत आयोजित करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सन्मानाची संधी मिळाली आहे. हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी पार पडणार आहे.
देशभरातून निवडक अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षमतेच्या आधारे या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात येते. त्यामध्ये श्रीमती गमरे यांची निवड होणे ही रत्नागिरी जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब मानली जात आहे. ग्रामीण भागात प्रत्येक घरापर्यंत स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याची सुविधा पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या जल जीवन मिशनच्या प्रभावी अंमलबजावणीत त्यांनी बजावलेल्या योगदानाची ही पावती असल्याचे बोलले जात आहे.
या निमित्ताने जिल्हा परिषद व प्रशासनातील सहकाऱ्यांकडून श्रीमती गमरे यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या या यशामुळे जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.

