(रत्नागिरी)
स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत नुतनीकरण खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते आज करण्यात आले. ही इमारत चांगली अशीच वर्षानुवर्षे राहण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. ती सर्वांची जबाबदारी आहे, असे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या सामाजिक बांधिलकी निधीमधून 2 कोटी 30 लाख रुपये खर्चून खानू प्राथमिक आरोग्य केंद्राचे नुतनीकरण करण्यात आले आहे. कोनशिला अनावरण करुन आणि फित कापून याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप, एसबीआयचे डीजीएम चंद्रशेखर बोहरा, मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र, अरुण जैन, बाबू म्हाप आदी उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. सामंत म्हणाले, ही अतिशय देखणी इमारत सुसज्ज्य सामुग्रीसह महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा खानू येथे होत आहे. माॕड्युलर ओटीसह ही देखणी इमारात उभी राहिली आहे. हिला संभाळणे ही देखील आपली जबाबदारी आहे. अतिशय चांगल्या पध्दतीचे प्राथमिक आरोग्य केंद्र जेव्हा आपण आपल्या गावामध्ये निर्माण करतो, ती वर्षानुवर्ष तशीच्या तशी टिकविणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. बाजूच्या ग्रामपंचायत इमारतीच्या दुरुस्तीसाठी लागणारा निधीदेखील मंजूर करतो. परंतु, चांगल्या दर्जाची इमारत तयार करण्यासाठी सरंपच आणि सदस्यांनी प्रयत्न केले पाहिजेत.
आज आपण सैनिकांचे आभार मानत आहोत. अरुण आठल्ये सैन्यामध्ये होते आणि आपल्या सर्वांसाठी लढत होते. म्हणून त्यांना मानवंदना देणे म्हणजे भारत सरकारच्या सर्व सैनिकांना मानवंदना देणे. असे सांगून विनामुल्य जागा देणारे माजी सैनिक अरुण आठल्ये यांचा त्यांनी सत्कार केला. अधिकाऱ्यांनी चांगलं काम करण्याचा जो संकल्प घेतला आहे तो कुठेही खंडित होऊ नये. इमारती चांगलं राहण्यासाठी ग्रामपंचायती सदस्य, ग्रामस्थ, अधिकाऱ्यांनी मेहनत घ्यावी, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण आणि धन्वंतरी पुजन करण्यात आले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला आशा, अंगणवाडी सेविका, परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.