(रत्नागिरी)
शहरातील कुंभारवाडा, सुभाष रोड, परटवणे येथे राहणारे जुन्या पिढीतील ज्येष्ठ शिक्षक आणि प्रख्यात कीर्तनकार दत्तात्रय धों. साळवी यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. काही काळापासून ते विविध आजारांशी झुंज देत होते. त्यांच्या निधनाने रत्नागिरीच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी झाली आहे.
‘साळवी गुरुजी’ म्हणून ओळखले जाणारे दत्तात्रय साळवी यांनी आपल्या अध्यापन कारकिर्दीची सुरुवात रत्नागिरी जिल्ह्यातील दुर्गम भागांतील शाळांमध्ये केली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे त्यांनी शिक्षकी पेशाला एक सामाजिक योगदान दिले. पुढील काळात ते रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले. शाळा क्रमांक २, ५ आणि २० मध्ये त्यांनी अनेक वर्षे सेवा दिली. त्यांच्या शिकवणीतून घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत.
शिक्षण क्षेत्राबरोबरच त्यांनी कीर्तन व शास्त्रीय संगीताच्या माध्यमातूनही समाजात आपली वेगळी छाप उमटवली. कोणतीही पारंपरिक पार्श्वभूमी नसतानाही ते एक नामवंत कीर्तनकार म्हणून ओळखले गेले. तबला आणि हार्मोनियम वादनातही त्यांचा हातखंडा होता. साळवी गुरुजी हे केवळ शिक्षक किंवा कीर्तनकार नव्हते, तर अनेक सामाजिक आणि धार्मिक चळवळीत त्यांचा सक्रीय सहभाग होता. विशेषतः कुंभार समाजाच्या प्रगतीसाठी त्यांनी नेहमीच प्रयत्न केले. त्यांच्या निधनानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंत्यसंस्कारप्रसंगी समाजातील अनेक मान्यवर आणि माजी विद्यार्थी उपस्थित होते.
त्यांचे उत्तरकार्य रविवार, दिनांक १८ मे २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी पार पडणार आहे.