(रायगड)
रायगड जिल्ह्यातील साळाव-रोहा रस्त्यावरील ताडगाव येथे रविवारी एक विचित्र घटना घडली. विहिरीत विष टाकल्याच्या संशयामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आणि ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. या प्रकरणी नवी मुंबईतील सीवूड्स परिसरात राहणाऱ्या पती-पत्नीविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पती-पत्नी मुळचे केळशीचे (दाभोळ, रत्नागिरी) असून सध्या नवी मुंबईतील सीवूड्स दारावेमध्ये राहतात.
अखलाक अयुब खान (वय 47) आणि रेश्मा अखलाक खान (वय 47) हे दाम्पत्य आपल्या मेहुणीच्या लग्नासाठी मुरुड तालुक्यातील चोरढे गावात आले होते. त्यांनी रेवदंडा येथे भाड्याने रिक्षा घेतली आणि साळाव ते चोरढे या मार्गावरील विविध विहिरींमध्ये कल्याणमधील एका मांत्रिकाने दिलेल्या “मंतरलेल्या” विटा टाकल्या. ताडगाव येथे रस्त्यालगत असलेल्या विहिरीत वीट टाकताना ग्रामस्थांनी त्यांना थांबवले आणि विचारणा केली. त्यावेळी त्यांनी दिलेले स्पष्टीकरण समाधानकारक न वाटल्यामुळे ग्रामस्थांनी रेवदंडा पोलिसांना माहिती दिली.
प्रकरणाची पार्श्वभूमी:
खान दाम्पत्याची मुलगी सादिया (वय 23) हिचे तुर्भे येथील एका तरुणासोबत पाच-सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र, या नात्याला पालकांचा विरोध होता. मुलीने आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर अखलाक आणि रेश्मा यांनी कल्याण येथील खालिद नावाच्या मांत्रिकाचा सल्ला घेतला. त्या मांत्रिकाने 21 “मंतरलेल्या” विटा देत त्या 21 विहिरींमध्ये टाकण्यास सांगितले, जेणेकरून सादियाचे प्रेमसंबंध तुटतील, असा त्याचा दावा होता. काही विटा नवी मुंबईतील विहिरींमध्ये टाकल्यानंतर, उर्वरित विटा मुरुड तालुक्यातील विहिरींमध्ये टाकण्यासाठी ते आले होते.
ग्रामस्थांचा संताप आणि पोलिसांची कारवाई:
विहिरीत विष टाकले असावे, असा संशय व्यक्त करत ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर रेवदंडा पोलीस ठाण्याबाहेर जमाव केला. या संतप्त गर्दीला शांत करण्यासाठी भाजपचे जिल्हा चिटणीस महेश मोहिते, कोर्लईच्या सरपंच राजश्री मिसाळ यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते. विष टाकल्याचा संभ्रम दूर करण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांनी ग्रामस्थांसमोर विहिरीतील पाणी पिऊन दाखवले. तसेच आरोपी दाम्पत्यानेही पाणी पिऊन दाखवले. त्यानंतर ग्रामस्थांचे संशय काही प्रमाणात निवळले.
गुन्हा दाखल:
या प्रकारामुळे परिसरात दहशत आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या कृत्याविरोधात पोलीसांनी कारवाई करत अखलाक आणि रेश्मा खान यांच्यासह मांत्रिक खालिद यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या सूचनेनुसार, अलिबाग मुख्यालय व मुरुड येथून अतिरिक्त पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती.