(संगमेश्वर / एजाज पटेल)
ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजली जाणारी लालपरी आपल्या अंधत्वावर रडत आहे. एसटी बसेसची अवस्था दयनीय झाली असून, प्रशासनाचे दुर्लक्ष प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. संगमेश्वर तालुक्यातील देवरुख आगारातून ग्रामीण भागातील विविध भागात धावणारी लालपरी प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरली आहे. एसटी बस कुठून आणि कुठे जाणार, याचा अंदाज बांधणे अनेकवेळा प्रवाशी जनतेला अतिशय कठीण होत आहे. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या एसटी बसेस चक्क फलकाविना धावत असल्याने प्रवाशी जनतेला अडचणी निर्माण करणाऱ्या ठरत आहेत.
एसटी बस कोणत्या मार्गावर धावणार हे समजण्यासाठी एसटी बसेसेवर मार्ग फलक लावणे अत्यावश्यक आहे. कारण त्यामुळे एसटी बस कोणत्या मार्गावर कोणत्या गावाकडे जाणार हे प्रवाशांना समजण्यास सोपे जाते. मात्र देवरुख आगारातून ग्रामीण भागाकडे धावणाऱ्या अनेक एसटी बसेसवरचे मार्ग फलक गायब असल्याचे दिसून येते. अशा स्थितीत एसटी बस कोणत्या मार्गावर जाणार हे प्रवाशांना समजून घेण्यात अडचण येत आहे. एवढेच नव्हे तर एसटी बस कोणत्या गावात जाणार आहे, कुठपर्यंत जाणार आहे व्हाया आहे की थेट आहे, हे कसे समजायचे असे प्रश्न प्रवाशांसमोर निर्माण होत आहेत.
त्यात भर म्हणजे ग्रामीण भागात धावणाऱ्या बसेसची अवस्था अतिशय दयनीय आणि बिकट झाली आहे. अनेक बसेसच्या काचांवर चुना लावून गावांची नावे लिहून काम भागवले जात आहे. तर अनेक बसेसमध्ये फलक तर लावले आहेत, परंतु रंग फिका पडला आहे आणि अस्पष्ट दिसत आहे. तसेच अनेक बसेसचे फलक तुटलेले आहेत. यावरून परिवहन विभागाचे गांभीर्य दिसून येते.
ग्रामीण भागात जीर्ण बसेसची संख्या जास्त
देवरुख आगाराच्या मोडक्या आणि तुटक्या बसेसे म्हणजे “म्हातारा नवरा, कुंकवाला आधार” असे म्हटल्यास काही वावगे ठरू नाही. कारण राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर दररोज हजारो प्रवासी अवलंबून असतात, मग ते शहर असो की गाव. अनेकवेळा नाईलाजाने जीर्ण बसमधून प्रवास करून जीव धोक्यात घालावा लागतो. सद्यस्थितीत अनेक बसेसची दुरवस्था झाली आहे. मात्र, एसटी प्रशासन याकडे गांभीर्याने न पाहता जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याने या बसेसच्या खिडक्या तुटणे, काचा फुटणे, कमी वेगाने धावणे, धावताना मोठा आवाज होणे अशा अनेक समस्या या बसेसमध्ये पहायला मिळतात. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात या जीर्ण बसेसची अधिक असल्याचे दिसून येत आहे.