(चिपळूण)
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाअंतर्गत परशुराम घाटातील धोकादायक दरडींवर सुरक्षिततेच्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पावसाळा जवळ आल्याने या कामांना वेग आला असून, सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
घाटातील धोकादायक दरडींवर लोखंडी जाळी बसवण्याचे काम सध्या अंतिम टप्प्यात असून, काही दिवसांत ते पूर्ण होणार आहे. या भागात मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याचा धोका असल्याने, दरडीमध्ये आठ ठिकाणी ड्रिल मशीनच्या सहाय्याने खडकात लोखंडी सळ्या बसवून त्यावर मजबूत जाळी बसवली जात आहे. या उपायाने पावसात दरडीमधून रस्त्यावर माती आणि दगड कोसळण्याचा धोका कमी होईल.
याशिवाय, तीन महिन्यांपूर्वी कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या ठिकाणी गॅबीयन वॉल उभारण्याचे कामही जोमात सुरू आहे. सुरुवातीला सिमेंट काँक्रीटचा पाया घालून त्यावर दगडी जाळीच्या साह्याने संरचना तयार केली जात आहे. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी महाडच्या राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प विभागाकडून विशेष प्रयत्न सुरू असून, उत्तराखंड येथील शासकीय कंपनीमार्फत ही कामे केली जात आहेत. सध्या गॅबीयन वॉलचे सुमारे ५०% काम पूर्ण झाले असून उर्वरित काम १५ जूनपर्यंत पूर्ण होण्याचा अंदाज आहे.
दोन ठिकाणी कृत्रिम धबधब्यांचे आकर्षण
परशुराम घाटाच्या पायथ्याशी प्रसिद्ध असलेल्या सवतसडा धबधब्यासह, आता घाटात नव्या संरचनांमुळे दोन कृत्रिम धबधबे तयार झाले आहेत. हे प्रत्यक्षात धबधबे नसले तरी, घाटातील धोकादायक ठिकाणी पाणी टप्प्याटप्प्याने खाली वाहून त्याचा वेग कमी करण्यासाठी खास रचना करण्यात आली आहे. परिणामी, हे धबधबे पर्यटकांचे नवीन आकर्षण ठरणार आहेत.
कामाचा वेग अधिक वाढविला
सुरक्षितता कामांच्या वेळेत पूर्णतेसाठी यंत्रणा आणखी बळकट करण्यात येत असून, या आठवड्यापासून मनुष्यबळ व यंत्रसामग्री वाढवली जाणार आहे.
“पावसाळ्यापूर्वी लोखंडी जाळी व गॅबीयन वॉल यांची कामे पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.” असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी पंकज गोसावी यांनी सांगितले.