(रत्नागिरी / प्रतिनिधी)
भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या आंबा हंगामाला मोठा फटका बसण्याची शक्यता असून, बागायतदारांची चिंता वाढली आहे. गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास सुरुवात झालेला पाऊस शुक्रवारी पहाटेपर्यंत कायम राहिला. त्यानंतर सकाळच्या सुमारास जोरदार पावसाने आपला दणका दाखवला. थोडी विश्रांती घेत पुन्हा दुपारच्या सुमारास पावसाने पुन्हा जोर पकडला आणि अनेक ठिकाणी सरी कोसळल्या.
अचानक अवकाळी ढगांचा फाटा जमा होऊन कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची आणि विशेषतः आंबा बागायतदारांची मोठी तारांबळ उडाली आहे. उन्हाच्या कडाक्यात पूर्णपणे परिपक्व होण्याच्या मार्गावर असलेल्या आंब्याचे नुकसान होण्याची भीती आहे. अनेक बागांमध्ये आंबे खाली पडण्याचे प्रकारही दिसून आले आहेत.
वीज पुरवठाही विस्कळीत; ग्राहकांमध्ये संताप
या अवकाळी पावसामुळे अनेक भागांत वीज पुरवठा खंडित झाला असून, नागरिकांना अंधारात रात्र काढावी लागली. भूमिगत विजवाहिन्या टाकण्यात आल्या असतानाही, थोड्याशा वाऱ्यासह वीज खंडित का होते, असा सवाल आता ग्राहकांकडून केला जात आहे.