(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिल्ह्यातील बुद्धिबळ क्षेत्रात उज्ज्वल भविष्याची नांदी ठरतील, अशी उल्लेखनीय कामगिरी येथील दोन युवा बुद्धिबळपटूंनी नुकत्याच विविध ठिकाणी पार पडलेल्या स्पर्धांमध्ये केली आहे. वरद पेठे व सौरिष कशेळकर या दोघांनी आपल्या शानदार खेळातून बुद्धिबळप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आहे.
वरद पेठे याने कुडाळ येथे खासदार श्री. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित खासदार चषक खुली जलद बुद्धिबळ स्पर्धा गाजवली. ५५ फिडे मानांकित खेळाडूंंसह तब्बल २५० हून अधिक प्रतिस्पर्ध्यांमध्ये वरदने अखेरच्या तीन फेऱ्यांमध्ये स्वतःपेक्षा अधिक फिडे मानांकन असलेल्या गोव्याच्या खेळाडूंवर मात करत, ८ पैकी ७ गुणांसह आणि सरस टायब्रेकच्या जोरावर उपविजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे, या स्पर्धेत त्याने एकही डाव गमावला नाही. याचबरोबर, वरदने नुकतीच पार पडलेली २५ वर्षांखालील रत्नागिरी जिल्हास्तरीय क्लासिकल स्पर्धा जिंकत अजिंक्यपद देखील आपल्या नावे केले आहे.
दुसरीकडे, सौरिष कशेळकर यानेही आपल्या उजव्या खेळीने चमकदार कामगिरी करत बुद्धिबळप्रेमींना आनंद दिला आहे. सांगली येथे पार पडलेल्या खासदार चषक अखिल भारतीय जलद फिडे मानांकन स्पर्धेत सौरिषने २९० हून अधिक स्पर्धकांमध्ये खेळत खुल्या गटात अकरावे पारितोषिक पटकावले. या स्पर्धेत त्याच्या फिडे मानांकनात २० गुणांची भर पडली. याशिवाय, गोव्यात पार पडलेल्या युनिटी क्लब द्वितीय खुल्या अतिजलद बुद्धिबळ स्पर्धेत सौरिषने २०० हून अधिक खेळाडूंमध्ये नववा क्रमांक मिळवून आपली गुणवत्ता अधोरेखित केली.
या दोघा बुद्धिमान खेळाडूंनी सातत्यपूर्ण कामगिरीद्वारे रत्नागिरीच्या बुद्धिबळ क्षेत्रात नवी ऊर्जा निर्माण केली असून, त्यांच्या या यशाबद्दल जिल्ह्यातील बुद्धिबळ वर्तुळात भरभरून कौतुक होत आहे. भविष्यातही हे दोघे राज्य व राष्ट्रीय पातळीवर रत्नागिरीचं नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास बुद्धिबळप्रेमींनी व्यक्त केला आहे.