(रत्नागिरी)
रत्नागिरीतील खेडशी नाका (ता. रत्नागिरी) येथे बुधवारी (३० एप्रिल २०२५) रात्री सुमारे आठ वाजता आंब्याच्या पेट्या वितरित करून परतणाऱ्या दोघा तरुणांना मारहाण करण्यात आली. गाडीच्या ताडपत्रीच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले. या प्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या मारहाणीत सुमित उर्फ सिद्ध रमेश चव्हाण (वय १९, रा. मिरकरवाडा) आणि इस्माईल नदाफ हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित चव्हाण आणि इस्माईल नदाफ हे पालघर येथील आंबा व्यापाऱ्यांना माल पुरवून हातखंबा मार्गे रत्नागिरीला परत येत होते. खेडशी नाका परिसरात त्यांची गाडी थांबवून सिद्धेश प्रकाश रसाळ, संदेश मारुती रसाळ (दोघे रा. नाचणे) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी गाडीवरील ताडपत्रीच्या कारणावरून वाद घालून लाकडी काठ्यांनी आणि हाताने दोघांना मारहाण केली. तसेच शिवीगाळही करण्यात आली, असे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. आरोपींपैकी दोन अनोळखी व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.