(रत्नागिरी)
तालुक्यातील करबुडे येथील नरबे गोवळकरवाडी या गावात शेजाऱ्यांतील जुन्या वादातून उगम पावलेल्या भीषण घटनेत एकाने धारदार सुरीने शेजाऱ्यावर सपासप वार करत गंभीर जखमी केले. ही धक्कादायक घटना १ मे २०२५ रोजी सकाळी ८.१५ ते ८.३० च्या दरम्यान घडली.
नारायण धर्मा धनावडे (वय ५५), व्यवसायाने शेतकरी, हे नेहमीप्रमाणे त्यांच्या शेतीच्या कामावर गेले असताना गावातीलच गुरुनाथ नारायण शितप याने त्यांच्या डाव्या बाजूला सुरीने घाव घालून हातावर, बोटांवर व उजव्या पायावर सपासप वार केले. इतक्यावरच न थांबता आरोपीने दगडाने कपाळावर घाव घालून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना फिर्यादी व आरोपी यांच्या कॉमन विहिरीजवळ घडली असून, संशयित आरोपीने फिर्यादीविषयी काही गैरसमज करून घेतल्यामुळे हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८३/२०२५ नोंदवण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी नारायण धनावडे यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून पुढील तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.
____