(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मावळंगे जाधववाडी ते कुर्धे पूर्णगड या महत्त्वाच्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण रखडल्यामुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आणि संतापाची लाट उसळली आहे. अनेक वर्षांपासून या रस्त्याची दुरवस्था होत असून, त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे हाल तर होतातच, शिवाय अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. प्रशासन एखाद्या जीवघेण्या अपघाताची वाट पाहत आहे का, असा संतप्त सवाल येथील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
या रस्त्याचा वापर पावस, मावळंगे, गावडे, आंबेरे आणि पूर्णगड भागातील लोक मोठ्या प्रमाणावर करतात. त्यामुळे हा रस्ता म्हणजे या भागातील जीवनवाहिनीच आहे. विशेषतः शालेय विद्यार्थ्यांपासून ते शेतकरी, कामगार आणि दैनंदिन प्रवासी यांच्यासाठी हा रस्ता अत्यंत आवश्यक आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती यापूर्वी पालकमंत्र्यांच्या आमसभेत देण्यात आली होती. जनसुविधा योजनेअंतर्गत या कामाची मंजुरी देखील मिळाली होती. मात्र, प्रत्यक्षात या कामाची सुरुवात झालेली नाही, हे चित्र आजही तसंच आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी या कामाबाबत ग्रामपंचायतीकडे विचारणा केली असता, १२ एप्रिल २०२५ रोजी संबंधित रस्त्याची ई-निविदा मंजूर झाल्याचे सांगण्यात आले. सहा महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्याचे आदेश ठेकेदाराला देण्यात आले आहेत. तरीदेखील अजून कुठलीही हालचाल झालेली नाही.
निवडणुका जवळ आल्या की अशा कामांना गती दिली जाते, काहीवेळा निविदा प्रक्रियेविना देखील डांबरीकरण करून श्रेय घेण्याची घाई केली जाते. मात्र यावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही काम न सुरू होणे म्हणजे प्रशासनाची उदासीनता आणि दुर्लक्षच म्हणावे लागेल. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून, लहान-मोठे अपघात घडत आहेत. प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन या रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर सुरू करावे, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.