(संगमेश्वर / एजाज पटेल)
महाराष्ट्रात वीजपुरवठ्याची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमधील अभियंते आपली भूमिका निष्ठेने पार पाडत आहेत. या अभियंत्यांचे नेतृत्व करणारी सब-ऑर्डिनेट इंजिनियर्स असोसिएशन (SEA) ही बलाढ्य संघटना अभियंत्यांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देत आहे. सध्या SEA ने महावितरण प्रशासनाच्या एकतर्फी आणि अपारदर्शी धोरणांविरोधात राज्यभर आंदोलन सुरू केले असून, त्याची तीव्रता रत्नागिरीतही जाणवत आहे.
SEA चे रत्नागिरी येथील सहसचिव यांनी सविस्तर माहिती देताना सांगितले की, महावितरणातील बदली धोरण, कर्मचारी भरती, स्टाफ सेटअप आणि कंपनीच्या पुनर्रचनेबाबत प्रशासन एकतर्फी निर्णय घेत आहे. यामध्ये अभियंत्यांना विश्वासात घेतले जात नाही, तसेच पारदर्शक धोरणांचा अवलंब केला जात नाही. याचा परिणाम केवळ अभियंत्यांवरच नव्हे, तर वीज ग्राहकांवरही होणार आहे. याविरोधात SEA ने १५ एप्रिल २०२५ पासून अभिनव आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनात अभियंत्यांनी अतिरिक्त कार्यभार सोडणे, महावितरणच्या मोबाइल क्रमांकावरील कॉल कार्यकारी अभियंत्यांच्या क्रमांकावर डायव्हर्ट करणे, प्रशासनाचे व्हॉट्सअॅप ग्रुप सोडणे, तसेच पेन डाऊन आणि कॉम्प्युटर डाऊन आंदोलनाचा समावेश आहे.
रत्नागिरीत वर्षानुवर्षे अभियंत्यांच्या रिक्त जागा असून, या जागांचा अतिरिक्त कार्यभार इतर अभियंत्यांवर टाकला जात आहे. आता या आंदोलनात अभियंत्यांनी हा कार्यभार सोडला आहे. तसेच, प्रशासनाला त्यांच्या कार्याची जाणीव व्हावी यासाठी कॉल डायव्हर्टचा मार्ग अवलंबला आहे. विशेष म्हणजे, हे आंदोलन ग्राहकांविरोधात नसून, वीजपुरवठा अखंडित ठेवण्यासाठी अभियंते रात्रंदिवस कार्यरत आहेत.
या आंदोलनात रत्नागिरी, संगमेश्वर, देवरुख, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, लोटे आदी तालुक्यांतील सुमारे १०० अभियंते सहभागी आहेत. SEA ने वीज ग्राहकांना या आंदोलनात सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. प्रशासनाने अभियंत्यांच्या मागण्या मान्य करून पारदर्शक धोरणे राबवावीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.