ग.दि. माडगूळकर यांच्या फुलांची झाली गं बरसात या कवितेतील पुढील ओळ कोकणातील नैसर्गिक सौंदर्याची आठवण करून देते…
झाली ग बरसात, फुलांची झाली ग बरसात
वसंतवेड्या लहरी भरल्या उसळत सर्वांगात।
जशी काश्मिरची कीर्ती तशी कोकणची ख्याती! नैसर्गिक साधनसंपत्ती, सौंदर्याचे मनमोहक रुप म्हणजे कोकण! कोकणातील नव्हेतर देशातील लेखकांनी ह्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेताना तो शब्दरुपाने वाचकांसाठी खुला केला आहे. कोकणातील साहित्यिक कवी यांच्यासाठी निसर्गाचा हा अनमोल ठेवा आहे, एकप्रकारचा आशीर्वाद आहे. कोकणातील साहित्यिकांच्या यादीत एक नाव ठळकपणे आपल्या लेखनीचा, अनुभवाचा ठसा जोरकसपणे, समर्थपणे उमटवीत आहे…जे.डी. पराडकर! अल्पावधीतच श्री घनश्याम पाटील चपराक प्रकाशन, पुणे यांनी जे.डी. यांची अनेक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्याच मालेतील केवळ ‘फुल’ हा विषय घेऊन विविध प्रकारची फुले नि वनस्पतींवर सखोल अभ्यास करून लिहिलेल्या वाचनीय अशा बत्तीस लेखांचा ‘ऋतुरंग’ निसर्ग लेखन संग्रह वाचण्यात आला. अत्यंत आकर्षक मुखपृष्ठ, रंगीत पाने, रंगीत अक्षरे आणि लेखाशी अनुरूप असे फुलाचे किंवा वनस्पतीचे चित्र! अशी ही रंगारंग मेजवानी समोर आल्यानंतर त्यावर अगदी अरसिक वाचकही ताव मारल्याशिवाय… हातात घेतल्याशिवाय पुढे जाणारच नाही. काही फुलं अशी असतात की, त्याचे नाव काढल्याबरोबर त्याचा आकर्षक रंग आणि बेधुंद करणारा सुवास अवतीभवती दरवळत असल्याचा भास होतो. या संग्रहात रातराणी, मोगरा, सुरंगी, चाफा ह्या सुगंधी फुलांसोबत रंगाने लक्ष वेधून घेणाऱ्या अनेक फुलांची सखोल माहिती मिळते. जसं तिळाचे फुल. पाहताक्षणी पाहतच राहावे असे कुसुम!
‘मोगरा’ म्हटलं की, एक बेभान करणारा सुगंध दरवळतो तसेच एक अजरामर गीत आपसूकच ओठांवर येते… संत ज्ञानेश्वर यांच्या या अलौकिक गीताला स्वरसाज चढविला आहे… सुप्रसिद्ध मंगेशकर भगिनींनी! पराडकर यांचा हा लेख वाचताना ह्या आठवणी जाग्या होतात ही किमया लेखकाच्या शब्द सामर्थ्याची!
मोगरा फुलला मोगरा फुलला।
फुले वेचिता बहरू कळियांसी आला ।।
होळीचा उत्सव सुरू असताना निसर्गही रंगांची बरसात करताना ‘बहावा’ वृक्षाला भरभरून फुलवतो नि जणू तो स्वतःही या रंगोत्सवात सहभागी होतो. बहावा या वृक्षाचा उल्लेख थेट रामायणात ‘कर्णिकार’ वृक्ष म्हणून झालेला लक्षात येतो.
रावण सीतेचे अपहरण करून नेत असताना सीता दिसेल त्याला मदतीचे आवाहन करते. त्याचवेळी तिचे लक्ष फुललेल्या कर्णिकार वृक्षांकडे जाते. सीता त्या वृक्षाला आळवते…
आमन्त्रये जनस्थाने कर्णिकारांश्च पुष्पितान्।
क्षिप्रं रामाय शंसध्व सीतां हरति रावण:॥
(अरण्यकाण्ड सर्ग ४९, श्लोक क्र. ३०)
जनस्थानात फुललेल्या कर्णिकार वृक्षा तुला प्रार्थना करते की, तू लवकरात लवकर श्रीरामाला माझा निरोप दे की, सीतेला रावण पळवून नेत आहे.
सीतेच्या विरहाने व्याकुळ झालेला राम कर्णिकार वृक्षांजवळ येतो. तो अगतिक होऊन कर्णिकार वृक्षाला विचारतो-
अहो त्वं कर्णिकाराद्य पुष्पित: शोभसे भृशम्।
कर्णिकारप्रियां साध्वीं शंस दृष्टा यदि प्रिया॥
(अरण्यकाण्ड सर्ग ६०, श्लोक क्र. २०)
हे कर्णिकार वृक्षा, तू सीतेला अतिप्रिय आहेस. तुझे हे आजचे फुललेले रुप खूप शोभून दिसत आहे. तू मला सांग, माझ्या पतिव्रता प्रियेला तू पाहिले आहेस का?
आकर्षक, रंगीबेरंगी, सुवासिक फुले महिलांसाठी अतिप्रिय! फुलांच्या गंधाने मोहित झालेल्या प्रियकराची भावना, त्याचा हळवेपणा पुढील गीतातून व्यक्त करतात…
गंध फुलांचा गेला सांगून
तुझे नि माझे व्हावे मिलन।
गुलाबाचा मखमली स्पर्श असेल, त्याचा सुगंध असेल हे सारे अधाशीपणे अनुभवताना हलकेच काहीतरी टोचते नि मग रमणी हलकेच चित्कारते. असेच एक काटेरी असले तरीही हवेहवेसे वाटणारे फुल म्हणजे… निवडुंग! जेव्हा ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांनाही निवडुंगाचा मोह होतो तेव्हा त्यांच्या लेखणीतून शब्द प्रसवतात…
निवडुंगाच्या शीर्ण फुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवन्दीच्या जाळिमधुनी!
वरील चरणातील शेवटी ज्या करवंदीचा उल्लेख आला आहे. त्या करवंदीच्या फुलांवर कविवर्य पराडकर यांनी सुंदर लेख लिहिला आहे. तो लेख वाचताना आधुनिक वाल्मिकी अशी ओळख असणाऱ्या गदिमा यांची रसरशीत कविता आठवते. ‘जाळीमंदी पिकली करवंद’ ह्या रचनेत कवी श्रेष्ठ आबालवृद्धांसह अनेकांची आवड करवंद असल्याचे सांगून एका गर्भवतीला डोहळे कशाचे लागतात तर….
मज लाज वाटते सांगाया ते धनी
घ्या तुमचं तुम्ही जरा तरी समजुनी
अहो, पाळणा उद्याचा हलतो माझ्या मनी
दऱ्या टेकड्या चला धुंडु या होउनी बेबंद
जाळीमंदी पिकली करवंद।
लेखक पराडकर प्रत्येक लेखात त्या त्या वनस्पतीचे, फुलांचे वैशिष्ट्य सांगताना त्यासंदर्भातील सारा इतिहास मांडतात. रंग, सुवास, फुलण्याचा- बहरण्याचा ऋतू – मोसम, औषधी उपयोग, सजावट इत्यादी बाबींची अत्यंत सखोल माहिती देतात. फुलांचा इतिहास मांडताना लेखकाचा अभ्यास, चिकित्सक वृत्ती, लेखन कला इत्यादी बाबी लक्षात येतात. प्रकाशक घनश्याम पाटील यांना जे.डी. नावाचा एक दिव्य ‘वृक्ष’ गवसला, दोघांच्या समन्वयातून एक अजरामर असा ‘ऋतुरंग’ फुलला,फळला,बहरला असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. जशी गृहिणी एक-एक फुल माळून सुंदर, आकर्षक, मनमोही गजरा माळते त्याप्रमाणे हा शब्दांचा गजरा वाचकांच्या हृदयात कायम वास्तव्य करणार हे खातरीने सांगतो. फुलांची मैफल रंगावी आणि त्या मैफलीत रंग भरण्यासाठी गजरा नसावा हे शक्यच नाही हे जाणून लेखक मित्र पराडकर यांनी ‘गजरा’ वाचकांना सादर केला आहे. तेव्हा आठवला तो गजरा ज्याला शब्दांनी माळले आहे… शांता शेळके यांनी…
भरभर खुडुनी फुलपाखरे
गजरा मी गुंफिन
निळी जांभळी पिवळी शोभा
वेणीवरी माळीन!
गानसम्राज्ञी भारतरत्न लतादीदी यांनी जादुई आवाजात गायिलेले कवी नारायण मुरलीधर गुप्ते यांच्या गीतातील चाफ्याच्या फुलाविषयी… इथे ही शब्दावली ‘चाफा’ फुलासाठी असली तरीही प्रियकर रुसलेल्या, फुगलेल्या प्रेयसीची मनधरणी करण्यासाठीही आहे…
चाफा बोलेना चाफा चालेना
चाफा खंत करी
काही केल्या फुलेना
‘असोशी’ गुरुवर्य राम शेवाळकर यांच्या कविता संग्रहाला प्रस्तावना ज्येष्ठ साहित्यिक मंगेश पाडगावकर यांनी केली आहे. ‘बोगनवेल’ या शेवाळकर यांच्या कवितेबद्दल पाडगावकर लिहितात…
बोगनवेल या कवितेत रंगगंधाच्या संवेदनातून एक नाजूक भावना बोलकी झाली आहे. लाल अबोली फुलांनी लवलेली बोगनवेल ‘त्यांची’ लाडकी आहे. ती बोगनवेल हलक्या हातांनी कुरवाळीत असताना त्या पर्णाचा मेळ तिच्या मनातल्या स्मरणाशी जुळतो. हा नाजुक मेळ पिंपळाच्या फांद्यांवरचे पिवळे हास्य, स्वाशीण कर्दळीचा विलोल शृंगार, लाल पळसाचे अबोल आव्हान, जाईच्या तळी टपटपलेले स्मित, छायेच्या गालात सूर्यकरांनी खुलवलेली खळी,… या सर्व प्रतिमातून उमलत जातो.
राष्ट्रीय फुल म्हणून ख्यातकीर्त ‘कमळ’ पुष्पाविषयीचा लेख वाचनीय आणि माहितीपूर्ण आहे.
पुरुषोत्तम दारवेकर यांच्या गीतातील एक कडवे….
मिटतां कमलदल
होई बंदी भृंग
परि सोडिना ध्यास,
गुंजनात दंग!
याशिवाय ऋतुरंग ज्या फुलांनी बहरला आहे, सुशोभित झाला आहे त्यात सुरंगी, दिव्यांची फुले, रातराणी, मधुमालती, गुलमोहर, माळेतले फुल, कातळावरची फुलं, कुरडूचे सौंदर्य, गुलबक्षी, सीतेच्या वेण्या, स्पर्धा गंधाची, कंदीलपुष्प, सोन मोहोरच्या सोनेरी वाटा, काटेसावर, कुडा, झेंडू, गोकर्ण, कर्दळ, तेरडा, गिरीपुष्प, दीपकाडी, हंस तुरा इत्यादी लेखांमधून त्या त्या फुलांची आणि वनस्पतींची इत्यंभूत माहिती दिली आहे. वाचनीय आणि वैविध्यपूर्ण असे दालन त्यांनी वाचक- रसिकांसाठी खुले केले आहे.
कोकण म्हटलं की, अजून काहीतरी जीभेवर रेंगाळते, ती चव घेण्यासाठी जीभ व्याकुळ होते, कितीही वेळा चाखला, अगदी ओरपला तरीही तृष्णा भागत नाही. तो म्हणजे हापूस आंबा! इच्छा आहे की, मित्रवर्य लेखक जे.डी.पराडकर यांच्या लेखणीतून कोकणाने देश-विदेशातील खवय्यांना वेड लावलेल्या हापूस आंब्याची शब्दरुपी रसाळीची मेजवानी देऊन तृप्त करावे.
▪️ नागेश शेवाळकर, पुणे
[९४२३१३९०७१]
________________________________________
ऋतुरंग : निसर्ग लेखन
लेखक : जे. डी.पराडकर
प्रकाशक : घनश्याम पाटील
(चपराक प्रकाशन,
पुणे)
{७०५७२९२०९२}
पृष्ठ संख्या : १२०
मूल्य : ₹ ३००/-