(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र, रत्नागिरी विभाग यांच्या वतीने १७ ते २१ एप्रिल या कालावधीत स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात भव्य नमन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यातील मान्यवर १० संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेत मिरजोळे गुरववाडी येथील नवतरुण कालिका नाट्य नमन मंडळाने प्रथमच सहभाग घेतला आणि आपल्या सशक्त सादरीकरणाच्या जोरावर तृतीय क्रमांक पटकावला. मंडळाच्या अभिनव आणि शिस्तबद्ध सादरीकरणाने रसिक प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली. विशेष म्हणजे, या नमनात आपल्या प्रभावी अभिनयाने ऋग्वेद भरत गुरव याने उपस्थितांचे लक्ष वेधले आणि त्याला उत्कृष्ट बालकलाकार म्हणून गौरवण्यात आले.
या नमनाच्या निर्मितीमध्ये दशरथ गुरव, संजय गुरव, तुकाराम गुरव यांचे योगदान महत्त्वाचे होते, तर दिग्दर्शनाची जबाबदारी सागर शिंदे व शिवाजी गुरव यांनी पार पाडली. शाहीर प्रणव गुरव यांच्या नेतृत्वाखाली एकूण २५ हून अधिक कलाकारांनी यात उत्साहाने सहभाग घेतला. कलाकारांमध्ये दिनेश, महेंद्र, ओंकार, ऋषीकेश, रितेश, दीपक, नितीन, भगवान, चंद्रशेखर, बावा, संदेश, तसेच आदित्य पायरे (मावशीच्या भूमिकेत), विराग, वीरेंद्र, विराज, आर्यन आदींचा समावेश होता.
या यशामागे मंगेश गुरव व ॲड. विजय गुरव (सोनवडे) यांचे विशेष सहकार्य लाभले. विजेतेपदाचे प्रमाणपत्र संस्थेचे अध्यक्ष नीलेश भगवान सांबरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मंडळाला प्रदान करण्यात आले. ही कामगिरी नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरली असून, मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी सकारात्मक ऊर्जा देणारी ठरली आहे.