(संगमेश्वर)
तालुक्यातील तुरळ–सरंद–आंबव पोंक्षे मार्गे आरवली या १० किमी अंतराच्या रस्त्याचे काम नुकतेच प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत पूर्ण झाले आहे. मात्र या नव्या रस्त्यावर बसवण्यात आलेले दिशादर्शक फलक चुकीचे असल्यामुळे नव्याने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची मोठी अडचण होत आहे.
सरंद पुलाजवळ माखजन–आरवली मुख्य रस्त्यावर बसवलेल्या फलकावर उजवीकडे वळल्यास ‘करजुवे’ असा दर्शवण्यात आले आहे. प्रत्यक्षात उजवीकडे वळल्यास तुरळकडे जाणारा रस्ता आहे. या ठिकाणी बाण उजवीकडे न दाखवता खाली वळलेला दाखवणे योग्य होते. अशा चुकीच्या दिशादर्शक फलकांमुळे वाहनचालक संभ्रमात पडत आहेत.
त्याचप्रमाणे, आंबव–पोंक्षे गावात ‘जुवळे वाडी’ असा फलक लावण्यात आला आहे, मात्र त्या फलकावर कोणतीही दिशा दर्शवलेली नाही. शिवाय जुवळे वाडी हे गाव त्या फलकापासून सुमारे २ किमी अंतरावर आहे. अनेक वाड्यांचे फलकही चुकीच्या ठिकाणी लावल्याचे दिसून येते. फलक बसवताना ग्रामपंचायतीशी समन्वय साधला गेला असता, तर हे गैरसमज टळले असते.
सरंद येथील या दिशादर्शक फलकाच्या चुका सध्या चर्चेचा विषय बनल्या असून, सदोष फलक त्वरित दुरुस्त करण्यात यावेत, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.