(रत्नागिरी / प्रतिनिधी)
गोवंश हत्येच्या निषेधार्थ रत्नागिरीत झालेल्या मोर्चा आणि रास्ता रोको प्रकरणी आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने यांच्यासह सुमारे ४५० ते ५०० जणांविरोधात या सोमवारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, सर्वांना वैयक्तिक जातमुचलक्यावर सोडण्यात आले आहे. संबंधित खटला रत्नागिरीतील न्यायालयात सुरू झाला आहे.
जुलै २०२४ मध्ये एमआयडीसी परिसरात एका प्राण्याच्या पिल्लाचे मुंडके सापडल्याने खळबळ उडाली होती. या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्थानकाबाहेर ठिय्या आंदोलन छेडले होते. गोवंश हत्येचा आरोप करत आरोपींच्या अटकेसाठी ४८ तासांची मुदत देण्यात आली होती. मात्र अपेक्षित कारवाई न झाल्यामुळे ७ जुलै रोजी सकल हिंदू समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात आला होता.
जेल नाका येथे रास्ता रोको, शेकडोंचा सहभाग
मारुती मंदिर येथून निघालेला मोर्चा जेल नाका परिसरात पोहोचताच आंदोलकांनी रास्ता रोको आंदोलन छेडले. जोरदार पावसातही आंदोलक ठाम उभे राहिले. मोर्चाचे नेतृत्व आमदार निलेश राणे यांनी केले होते. यावेळी “गोमाता के सन्मान में, हर हिंदू मैदान में”, “प्रशासन हाय-हाय…” अशा घोषणा देण्यात आल्या. पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमकीही झाल्या. आंदोलनामुळे दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
शहर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम १८९(२), १८९(३) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७(१), १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. सोमवारी दाखल करण्यात आलेल्या दोषारोपपत्रात आमदार निलेश राणे, माजी आमदार बाळ माने, चंद्रकांत राऊळ, राकेश नलावडे, नंदकुमार चव्हाण, पराग तोडणकर, दत्तात्रय जोशी, रोहित शिंदे, सागर कदम, आणि इतर कार्यकर्त्यांची नावे नमूद आहेत.
न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा
संशयितांच्या वतीने अॅड. भाऊ शेट्ये, अॅड. रत्नदीप चाचले, अॅड. स्वाती शेडगे, अॅड. सोनाली रहाटे, अॅड. निनाद शिंदे, अॅड. सचिन थरवळ यांनी न्यायालयात प्रतिनिधित्व केले. न्यायालयाने तात्पुरत्या दिलासादायक निर्णयात सर्व संशयितांना वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्यात आले आहे.