(राजापूर / प्रतिनिधी)
भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा राजापूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १३४ वा जयंती महोत्सव कार्यक्रम आज १४ एप्रिल २०२५ रोजी ग्रामशाखा ओणी येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुकाध्यक्ष सत्यवान जाधव होते. सदर कार्यक्रमाला प्रवचनकार म्हणून भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी जिल्हा महामंत्री, केंद्रीय शिक्षक, माजी श्रामणेर , बौद्धाचार्य एन. बी. कदम उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आपण साजरी का करावी ? जयंती साजरी करण्याचे महत्व तसेच बाबासाहेब यांनी कोणत्या अवघड परिस्थितीशी सामना करीत आपले शिक्षण, उच्च शिक्षण कसे पूर्ण केले याची सविस्तर माहिती आदरणीय कदम यांनी दिली. भिवाच्या शिक्षणासाठी रामजी बाबा यांचे योगदान त्यांनी कथन केले. बाबासाहेब केवळ दलितांचे उद्धारक नसून त्यांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी आणि आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी काय केले यांचे सोदाहरण सविस्तर विवेचन आपल्या प्रवचनात केले. उपस्थित बंधू-भगिनी यांनी जवळपास तासभर प्रवचन लक्षपूर्वक श्रवण केले.
यावेळी सुधाकर जाधव ( पाचल ), शामराव तांबे ( ससाळे ), मंगेश पवार ( नाणार ), नी सिया जाधव (कळसवली ), यांनी आपल्या मनोगतातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तालुका सचिव संदेश यादव यांनी केले.