(जयपूर)
सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरु (RCB) संघाने राजस्थान रॉयल्सवर (RR) ९ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवला. नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेल्या आरसीबीने राजस्थानला १७३ धावांत मर्यादित केले. प्रत्युत्तरात, विराट कोहली आणि फिल सॉल्ट यांच्या जोरदार फलंदाजीच्या जोरावर बंगळुरु संघाने १८ व्या षटकातच लक्ष्य सहज गाठले. आरसीबीने राजस्थान रॉयल्सचा नऊ विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत चार गडी गमावून १७३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, आरसीबीने १७.३ षटकांत एक गडी गमावून १७५ धावा करून सामना जिंकला. यासह आरसीबी इतर संघांच्या घरच्या मैदानावर त्यांची विजयाची मालिका कायम ठेवली आहे.
आरसीबीकडून सॉल्टने ३३ चेंडूत पाच चौकार आणि सहा षटकारांसह ६५ धावा केल्या, तर कोहलीने ४५ चेंडूत चार चौकार आणि दोन षटकारांसह ६२ धावा केल्या. याशिवाय, प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या देवदत्त पडिक्कलने २८ चेंडूत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद ४० धावा केल्या. राजस्थान रॉयल्सकडून फक्त कुमार कार्तिकेलाच एक विकेट्स घेता आली.
आयपीएल २०२५ हंगाम सुरू झाल्यानंतर तीन आठवड्यांनी, पहिला सामना जयपूरमधील सवाई मान सिंग स्टेडियमवर खेळवण्यात आला. याआधी राजस्थानने गुवाहाटीमध्ये आपले दोन घरचे सामने खेळले होते. अशा परिस्थितीत, संघाला त्याच्या खऱ्या घरच्या मैदानावर परतल्यानंतर चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा होती, पण प्रथम फलंदाजांनी आणि नंतर क्षेत्ररक्षकांनी संघाला निराश केले. या सामन्यात राजस्थानने एकूण ५ झेल सोडले, ज्याचा फायदा सॉल्ट आणि कोहलीने घेतला. मात्र, त्यांच्या आधी, आरसीबीनेही ३ झेल सोडून राजस्थानला फायदा करुन दिला होता.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सने १७३ धावा केल्या. या सामन्यात संघाची सुरुवात संथ झाली आणि कर्णधार संजू सॅमसन धावांसाठी संघर्ष करताना दिसला. परंतु, दुसऱ्या बाजूला, यशस्वी जैस्वाल सतत वेग वाढवत होता. सॅमसननंतर, रियान परागने थोडी मदत केली पण फलंदाजांना मुक्तपणे फलंदाजी करण्यात अडचणी येत राहिल्या. यादरम्यान, जैस्वालने हंगामातील त्याचे दुसरे अर्धशतक झळकावले पण इतर फलंदाजांनी त्याला फारशी साथ दिली नाही. शेवटी, ध्रुव जुरेलने काही मोठे फटके मारून फिनिशींग टच दिले. आरसीबीसाठी कृणाल पंड्या (१/२९) सर्वात प्रभावी गोलंदाज ठरला.