(चिपळूण)
वाशिष्ठी नदीपात्रात पोहायला गेलेल्या दहावीतील विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सायंकाळी ४:३० वाजण्याच्या सुमारास घडली. गोवळकोट मोहल्ला येथील तलहा मन्सूर घारे (१५, गोवळकोट मोहल्ला, चिपळूण) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे.
तलहा घारे दहावीत असून, मंगळवारी शेवटचा पेपर झाला. बुधवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास भाऊ व मित्रांसह तो गोवळकोट येथील नगर परिषदेच्या जॅकवेलनजीक पोहण्यासाठी गेला होता. मात्र त्याचवेळी वाशिष्ठीला मोठ्या प्रमाणात भरतीचे पाणी आले होते. नदीच्या प्रवाहात तलहा घारे व त्याचा छोटा भाऊ असे दोघेजण वाहून गेले. मात्र छोटा भाऊ वाचला आणि तलहा घारे काही क्षणांत दिसेनासा झाला.
आरडाओरडा होताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. तलहा घारे याचा स्थानिक बोटचालकांच्या मदतीने शोध घेण्याचा प्रयत्न केला असता तो अर्ध्या तासाने मृतावस्थेत सापडला. पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.