(मुंबई / प्रतिनिधी)
दिंडोरी प्रणीत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गातर्फे श्री क्षेत्र वज्रेश्वरी (भिवंडी)या शक्तिपीठावर उद्या मंगळवार दि. १८ मार्च २०२५ रोजी राष्ट्रीय महासत्संग सोहळा तथा १०८ कुंडात्मक श्री वज्रचंडी यज्ञ, श्री दुर्गासप्तशती पठण आणि श्री चक्रराज श्रीयंत्र पूजन अशी सर्वोच्च आध्यात्मिक सेवा आयोजित करण्यात आली आहे.
आदिशक्ती श्री पार्वती मातेचे रूप असलेल्या श्री वज्रेश्वरी मातेचा उल्लेख नवनाथ भक्तिसार ग्रंथात आढळतो. हे देवस्थान अत्यंत शक्तिशाली, जागृत आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे आहे. येथील गरम पाण्याची कुंडेही प्रसिद्ध आहेत. या क्षेत्राचे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन गुरुमाऊली श्री. अण्णासाहेब मोरे यांच्या आज्ञेने आणि आशीर्वादाने श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे जनहितासाठी ही सेवा घेण्यात येत आहे. सेवामार्गातर्फे राष्ट्र, समाज आणि विश्वशांतीसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. या सर्वच उपक्रमांमध्ये सेवेकऱ्यांचा आजवर अभूतपूर्व प्रतिसाद लाभतो आहे. याच श्रृंखलेमध्ये श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे चाळीस एकर इतक्या विस्तीर्ण क्षेत्रावर हा उपक्रम होत आहे.
मंगळवार दि.१८ मार्च रोजी सकाळी सहा ते नऊ या वेळेत भूपाळी आरती, श्री दुर्गा सप्तशती पठण, हवन, तर्पण, अशी पंच अंगात्मक सेवा अर्थात वज्रचंडी यज्ञ होईल. त्यानंतर सकाळी नऊ ते साडेदहा वाजेपर्यंत श्री चक्रराज श्री यंत्राची सेवा आणि साडेदहा वाजता महाआरती त्यानंतर गुरुमाऊली श्री अण्णासाहेब मोरे यांचे अमृततुल्य हितगुज होईल. हितगुजानंतर महाप्रसादाचे वाटप आणि त्यानंतर या दिव्य वज्रचंडी यज्ञाची सांगता होईल.
या कार्यक्रमाबाबत अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे उपव्यवस्थापक गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे यांनी सांगितले की, सेवामार्गातर्फे सदैव मानवतावादी दृष्टिकोनातून बहुविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. अध्यात्म केवळ नावापुरता असून विश्वशांती, जनहित आणि राष्ट्रालाच सेवामार्गातर्फे प्राधान्य दिले जाते. वज्रेश्वरी येथील कार्यक्रम हा याच उद्देशाने आयोजित करण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. या कार्यक्रमामुळे मुंबई ठाणे पालघर परिसरातील सेवेकऱ्यांमध्ये उत्साह निर्माण झाला असून आजच्या कार्यक्रमाला भक्त भाविक आणि सेवेकऱ्यांची विक्रमी गर्दी उसळण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाला स्थानिक प्रशासनाचेही उत्तम सहकार्य लाभले आहे. वेरूळ येथे अभूतपूर्व प्रतिसादात राष्ट्रीय सत्संग मेळावा झाल्यानंतर आता तसाच भव्य दिव्य सोहळा श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे होत असल्याने सेवेकर्यांनी आनंद व्यक्त केला.