(रत्नागिरी)
रत्नागिरी मजगांव येथील इब्जी कुटूंबातील थोर माता चांदबी इब्जी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले. त्या अशिक्षित असूनदेखील स्वत: कष्ट करून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे त्यांची ज्येष्ठ कन्या आणि ज्येष्ठ मुलगा शिक्षक पेशातून सेवानिवृत्तही झाली आहेत. तर दोन मुलगे परदेशात नोकरी करीत होते.
चांदबी इब्जी यांचेकडे कोणत्याही प्रकारची मदत मागण्यास आलेला व्यक्ती केव्हाच रिकाम्या हाताने परत गेलेला नाही. शैक्षणिक, सामाजिक बाबी सोबत त्यांच्या घरात समाजसेवा करण्यासाठी, जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी राजकारण ही जपले गेले. त्यांच्या इच्छेनुसार मोठी सून, मोठी नात यांनी ग्रामपंचायत सदस्य पदी राहून ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर त्यांचे छोटे चिरंजीव ग्रामपंचायत मजगांवचे उप सरपंच पदी विराजमान आहेत.
या अशिक्षित महिलेच्या शैक्षणिक इच्छेमुळे त्यांनी आपल्या घरात सेवानिवृत्त शिक्षक, उद्योजक, डाॅक्टर, सी.ए., नर्स, इंजिनिअर तसेच पदवीधरांचा ताफाच निर्माण करुन त्यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. त्यांच्या निधनामुळे त्यांच्या घरात एक पोकळी निर्माण झाली आहे. मुले सुध्दा सेवानिवृत्त झाली तरी त्यांनी घरात एकोपा निर्माण करुन ठेवला होता. त्यांच्या निधनामुळे कुटुंबिय, नातेवाईक, मित्रमंडळी तसेच ग्रामस्थांनी शोक व्यक्त केला आहे. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, तीन सुना, मुलगी, जावई, नातवंडे पतवंडे असा मोठा परिवार आहे.