(रत्नागिरी)
सध्या उन्हाचा पारा ३५ ते ३७ अंश झाला आहे. त्याचा परिणाम नागरी जीवनावरच नव्हे तर पशुपक्ष्यांवर झाला आहे. एवढेच नाही तर गुहागरच्या पर्यटनाला तापमानवाढीचा फटका बसत आहे. सकाळी नऊ वाजेपर्यंत हवेत गारवा असतो तर त्यानंतर उन्हाच्या झळांना सुरवात होते. परिणामी, गुहागरमधील रस्ते दुपारी सुनसान होतात. दहावी, बारावीच्या परीक्षांबरोबरच कडाक्याच्या उन्हामुळेही पर्यटकांच्या संख्येत घट होऊ लागली आहे.
हिवाळा संपत आल्याचे संकेत मिळू लागल्याने समुद्रकिनाऱ्यावर दिसणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या संख्येतही घट होऊ लागली आहे. गेल्या वर्षी याच दरम्यान कमाल तापमान ३३.५ तर किमान तापमान १३.५ अंश सेल्सिअस होते. गेल्या १० ते १५ वर्षांमध्ये निसर्गसौदर्याने नटलेले येथील डोंगर जंगलतोडीमुळे उघडे पडू लागले आहेत. त्यामुळे निसर्गाचा समतोल ढासळू लागला होता. त्यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. हिवाळा सुरू झाला की, परदेशातून कोकणात येणाऱ्या सीगल पक्ष्यांच्या वास्तव्यावरही उष्म्याचा परिणाम झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
सकाळी थंड वातावरणामुळे सीगल पक्षी किनाऱ्यावर येतात त्यानंतर ते किनाऱ्यावरील सुरूबनात निघून जातात. मागील आठवड्यात गुहागर, हर्णे, मुरूड, या किनाऱ्यांवर सीगल पक्ष्यांचे प्रमाण कमी दिसत होते. कदाचित ते उन्हाळा सुरू झाल्याची चाहूल लागल्यामुळे परतीच्या प्रवासाला लागले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.