(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड ग्रामपंचायतीमध्ये महिला दिन मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मालगुंड गावच्या सरपंच श्वेता खेऊर यांचे प्रमुख अध्यक्षतेखाली घेण्यात आला. या कार्यक्रमाला डॉक्टर संजीवनी काणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच या कार्यक्रमाला एकता संघाच्या सचिव स्वरा देसाई यांचे समवेत मालगुंडच्या उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी अंगणवाडी सेविका, आशा सेविका, मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, लॅब टेक्निशियन, उमेदच्या सीआरपी व सर्व पदाधिकारी ,बचत गटातील महिला आदींची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.
या कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत मालगुंडच्या सरपंच श्वेता खेऊर यांनी पुष्प देऊन केले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, पुण्य पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून महिला दिनाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मालगुंड ग्रामपंचायतीच्या सदस्या तथा माजी शिक्षण विस्तार अधिकारी शुभदा मुळ्ये यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगून महिला दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात महिलांची रक्त तपासणी, आयुष्यमान कार्ड काढणे तसेच द्वितीय सत्रात महिलांची सभा व तृतीय सत्रात आहारतज्ज्ञ डॉक्टर संजीवनी काणे यांचे स्त्रियांचे आरोग्य व योग्य आहार या विषयावर मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका कुमारी तारवे, सौ. गोवळकर, श्री.जाधव, मोहिते व आशा सेविका यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाच्या द्वितीय सत्रात महिलांच्या सभेमध्ये उमेदच्या सचिव स्वरा देसाई यांनी विविध सरकारी योजना, व्यवसायाच्या विविध वाटा आणि संधी यावर मार्गदर्शन केले, तर मालगुंडच्या ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये यांनी महिला सभेचे महत्त्व, महिलांचे जीवनमान, हक्क व कर्तव्ये यावर आपले विचार मांडले. हा कार्यक्रम अतिशय नियोजनबद्ध व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामपंचायत सदस्या शुभदा मुळ्ये यांनी तर आभारप्रदर्शन सीआरपीच्या पूर्वा दुर्गा दुर्गवळी यांनी केले.