( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
जिल्ह्यातील अनाथ, अंध, अपंग यांना मिळणारा निराधार भत्ता मागील तीन महिन्यापासून मिळत नसल्याने सर्व अंध, अपंग बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. याकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असून शासन आणि प्रशासन यांनी याबाबत त्वरित दखल घेऊन अपंगाना मिळणारा निराधार भत्ता तात्काळ देण्यात यावा अशी मागणी राष्ट्रीय अपंग महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे यांनी केली आहे.
केंद्रातील आणि राज्यातील शासनामार्फत अनाथ, अंध, अपंग, वयोवृद्ध, विधवा, परितक्त्या, या घटकांना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ योजना, यामार्फत दरमहा 1500 रुपये अनुदान देण्यात येते. हे अनुदान तुटपुंज मिळत असल्याने वाढीव अनुदान मिळण्याची एकीकडे मागणी केली जाते परंतु दिले जाणारे तुटपुंज अनुदान देखील दिव्यांग बांधवांना मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील हजारो बांधवांचे गेल्या तीन महिन्यांपासून अनुदान रखडले असल्याने जगावं की मरावं असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शासनाकडून मोफत मिळणारे अन्नधान्य आणि दरमहा 1500 अनुदान यामुळे अंध, अपंग बांधवांचे कुटुंब कसे तरी जगत आहे. मात्र मागील 3 ते 4 महिन्यापासून अनुदान मिळणे बंद झाले असल्याने अनेक अंध अपंग बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. अंध , अपंग बांधव कोणत्याही मजुरीला जावू शकत नाही. त्यांचा संसाराचा भार शासनाकडून मिळणाऱ्या निराधार भत्यावर अवलंबून असतो. त्यामुळे शासन प्रशासन यांनी या अनाथ, अंध, अपंग, वृद्ध बांधवांची परिस्थिती लक्षात घेऊन तात्काळ अनुदान देण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रीय अपंग महासंघाचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे यांनी केली आहे.