(रत्नागिरी / प्रतिनिधी)
जमीन विक्रीच्या बहाण्याने सरकारी कर्मचाऱ्याला तब्बल २२ लाखांचा चुना लावल्याचा आरोप असलेल्या निलेश कीर या सावकाराला शहर पोलिसांनी मंगळवारी (दि.१८) अटक केली. या वादग्रस्त सावकाराकडून यापूर्वी देखील लोकांकडून भरसाठ पैसे उकळण्याच्या घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. मात्र यावेळी चक्क या सावकाराने वकिलाला हाताशी धरून फसवणूक केल्याचा गुन्हा शहर पोलिसांत दाखल करण्यात आला होता.
दरम्यान अटक टाळण्यासाठी कीर याने रत्नागिरी न्यायालयापुढे अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावताच मंगळवारी शहर पोलिसांकडून कीर याला अटक करण्यात आली. याबाबत अधिक माहिती अशी, संदीप वेलोडे यांनी यापूर्वी निलेश कीरकडून १० टक्के व्याजाने २५ हजार रुपये घेतले होते. ते त्यांनी सव्याज परतफेडही केले होते. त्यानंतर वेलोंडे यांचा मित्र सुभाष गराटे यांना १० लाख रुपयांची गरज होती. वेलोंडे यांनी गराटे यांना गराटेची भेट करून दिली. नीलेश किरने सुभाष गराटे १० लाख रुपये देऊन रक्कम व्याजासह सहा महिन्यात परत न केल्यास गराटे यांची ओरी येथील २५ एकर जमीन कीर यांच्या नावावर करून देण्याबाबत बोलणी झाली.
सहा महिन्यात गराटे यांनी पैसे परत केले नाहीत. त्यामुळे कीरने गराटे यांच्या नावावरील 25 एकर जमीन आपल्या नावावर करून घेतली होती. जमीन नावावर करून दिल्यानंतर गराटे मुंबईला निघून गेले होते व काही दिवसांनी ते पुन्हा रत्नागिरीत आल्यावर त्यांचा किरसोबत वाद झाला होता. तेव्हा त्यांनी मध्यस्थी संदीप वेलोडेना बोलावून घेतले. पैशाच्या बदल्यात 25 एकर जमीन तुम्हाला गराटे यांनी दिली आहे. त्यामुळे हा विषय आता तुम्ही येथेच थांबवा, असा सल्ला वेलोडे यांनी दिला. यावेळी नीलेश कीरने तुझे कोरे चेक माझ्याकडे आहेत. तुझी वाटच लावून टाकतो, अशी धमकी वेलोंडे यांना दिली. दरम्यान, ही जमीन कीरला नको असल्याने कीरने मध्यस्थी वेलोंडे यांनाच ती विकत घेण्याचा तगादा लावला. त्याच्या त्रासाला कंटाळून ही जमीन वेलोडे यांनी खरेदी करण्याचा निर्णय घेतला. कीरने या जमिनीचा दर 25 लाख रुपये सांगितला. वेलोडे यांचे मित्र देवरूखकर आणि कीर यांचे वकील अॅड. महेश नलावडे यांच्या माळनाका येथील कार्यालयात जमिनीच्या व्यवहाराची बोलणी झाली.
जमिनीचा दर २२ लाख ७२ हजार ठरला. ॲड. महेश नलावडेच्या कार्यालयात त्यांनी कीरच्या सांगण्यानुसार जागेचे खरेदीखत तयार केले होते. ठरल्याप्रमाणे रक्कम कीर याला देण्यात आली. त्यानंतर वकिलांसमोर या खरेदीखतावर सह्या झाल्या. कीर याने हातात रक्कम पडल्यानंतर ही रक्कम मी घरी ठेवून येतो, तुम्ही रजिस्टर ऑफिसला या असे सांगितले. त्यानुसार कीर रक्कम घेऊन घरी निघून गेला व वेलोंडे, देवरूखकर नामक व्यक्ती आणि कीरचे वकील ॲड महेश नलावडे हे तिघे रजिस्टर कार्यालयात पोहोचले. एक तास झाला तरी कीर त्या ठिकाणी आलाच नाही. त्यामुळे ॲड नलावडेने वेलोंडे आणि देवरूखकर यांना तुमचे खरेदीखत मी करून देतो, तुम्ही काळजी करू नका, असे सांगून त्या दोघांना घरी पाठवून दिले. त्यानंतर कीरशी वेलोडे आणि देवरूखकर यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतू, किरने प्रतिसाद दिला नाही. वकिलानेही उडवाउडवीची उत्तरे दिली. पैसेही गेले, जमीनही गेली असे लक्षात आल्यानंतर वेलोंड यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
कायद्याचा धाक आहे की नाही?
अशा घटनांमुळे सावकारांना कायद्याचा धाक आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत वैद्य, अवैध्य सावकारांच्या विरोधात तक्रारी दाखल झाल्याने याचे गांभीर्य वाढले आहे. तत्कालीन पोलीस निरीक्षक सणस यांच्या माध्यमातून पोलीस दलाने सावकारी पाशातून सामान्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला होता. या कारवाईमधून पोलिसांचे कौतुक करण्यात येत होते. मात्र त्यानंतर कारवाई थंडावल्याने पुन्हा सावकारांनी डोकं वर काढल्याचे पाहायला मिळत आहे.