(रत्नागिरी /प्रतिनिधी)
कांदळवनाची जैवविविधता संवर्धन करणे ही सर्वांची नैतिक जबाबदारी आहे. संवेदनशीलता आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी या कार्यशाळेचा उद्देश असल्याचे कांदळवन विभाग (दक्षिण) च्या विभागीय अधिकारी कांचन पवार यांनी सांगितले.
कोकणच्या किनाऱ्यावरील समुद्री प्राण्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी रत्नागिरीत मंगळवारी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत कांचन पवार यांनी कांदळवन संवर्धनाबाबत माहिती दिली.
कांदळवन प्रतिष्ठान, बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) यांच्या संयुक्त विद्यमाने सागरी सस्तन व अन्य मोठे प्राणी किनाऱ्याला लागणे, अपघात, प्रतिसाद आणि संवर्धन या विषयावर ही कार्यशाळा आयोजित केली होती. व्यासपीठावर कांदळवन कक्षाचे संचालक किशोर रिठे, कांदळवन विभाग (दक्षिण) च्या विभागीय अधिकारी कांचन पवार, चिपळूण प्रादेशिक विभागाच्या वनसहायक संरक्षक प्रियंका लगड, कांदळवन कक्षाच्या सहायक संरक्षक प्रियंका पाटील, रत्नागिरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी नीलेश माईनकर, रत्नागिरी सीमा शुल्क विभागाचे सहायक आयुक्त संदीप कृष्ण उपस्थित होते.
प्रारंभी कांदळवन कक्षातर्फे माहितीपट दाखविण्यात आला.कांदळवन प्रतिष्ठानचे उपसंचालक मानस मांजरेकर यांनी प्रतिष्ठानच्या कार्याविषयक माहिती दिली. कांचन पवार, किशोर रिठे यांनी कांदळवन कक्षाची कार्यप्रणाली विशद केली. संदीप कृष्णा, नीलेश माईणकर यांनी समुद्री जलचरांच्या संवर्धनासाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेमुळे समुद्राशी संबंधित इतर विभागांनाही मार्गदर्शन होण्यास मदत होईल, असे मनोगत व्यक्त करताना सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या शास्त्रज्ञ डॉ. रेश्मा पितळे यांनी केले. यावेळी कांदळवन विभागाचे वन क्षेत्रपाल किरण ठाकूर, वन विभाग रत्नागिरीचे वन क्षेत्रपाल प्रकाश सुतार, सीमा शुल्क विभाग, मत्स्य विभाग, तटरक्षक दलाचे अधिकारी, कर्मचारी, कांदळवन प्रतिष्ठानचे पदाधिकारी, तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे शास्त्रज्ञ, कांदळवन कक्षाचे रत्नागिरी, सिंधुदुर्ग रायगड येथील सागरमित्र, तसेच रत्नागिरीतील अशासकीय संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.