(रत्नागिरी / प्रतिनिधी)
मुंबई-गोवा महामार्गावरील रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र महामार्गांवर छोट्या-मोठ्या अपघातांची मालिका सुरूच असल्याचे चित्र आहे. बावनदी पुलानजिक बुधवारी ( दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ ) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास सिमेंट वाहतूक करणारा ट्रक थेट खोदलेल्या चरित कोसळला. या अपघातात जे के फाईल-रत्नागिरी येथील तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. यात एका महिलेचा देखील समावेश आहे.
या महामार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू असले तरी वाहतूकीला डोकेदुखी ठरेल असेच काहीसे काम ठेकेदार ईगल कंपनीमार्फत सध्या सुरू आहे. रत्नागिरी येथून सिमेंट भरून देवरुखच्या दिशेने ट्रक ( गाडी क्र. MH 09 BC 5941 ) वाहतूक करत होता. आपल्या ताब्यातील ट्रक घेऊन चालक क्षीनोद शर्मा ( राहणार, जे. के. फाईल, वय ५०) हा बावनदी पुलाजवळ आला असता रस्त्याच्या बाजूलाच खोदून ठेवलेल्या अंदाजे २५ ते ३० फूट खोल दरीत ट्रक कोसळून पलटी झाला. समोरून येणाऱ्या गाडीने ट्रकचालकाला हुलकावणी दिल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्त ट्रकच्या एका बाजूचा भाग पूर्णपणे चेपून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळूनही ट्रक चालकासह कमलेश छोटूराम रावस ( वय ४२, रा. जे के फाईल), गुडिया कमलेश रावस (वय ४०, रा. जे के फाईल ) असे एकूण तिघे बचावले असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
या अपघाताची माहिती मिळताच हातखंबा महामार्ग पोलिस केंद्राचे एएसआय घाग, एएसआय हलगी, हेड कॉन्स्टेबल संसारे यांच्यासह जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणीजची रुग्णवाहिका दाखल होऊन जखमींना स्थानिकांच्या मदतीने रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या अपघात प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस पुढील कार्यवाही करीत आहे.
ठेकेदाराच्या नावाने वाहनचालकांमधून संताप
मुंबई गोवा महामार्गावरील बावनदी ते हातखंबा या पट्ट्यातील काम ईगल कंपनीमार्फत केले जात आहे. निवळी घाटात काँक्रीटकरणाच्या तुकड्यात केलेल्या मार्गिका वगळता उर्वरित रस्ता खड्डेबंबाळ झालेला आहे. वाहने घसरून अनेकांना गंभीर दुखापतीसह किरकोळ दुखापतीचा सामना करावा लागला आहे. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाचे अधिकारी याकडे पूर्णतः दुर्लक्ष करीत असून ठेकेदार ईगल कंपनीला चांगलेच फावले आहे. ठेकेदार कंपनीचा सुरू असलेला मनमानी कारभार पाहता ठेकेदाराच्या नावाने वाहनचालक संताप व्यक्त करीत आहेत.