(मुंबई)
उद्धवसेनेचे सहा, सात खासदार फुटणार अशी बातमी त्यांनी सोडली आहे. शिवसैनिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. आता पुन्हा फोडाफोडी करू नका. तसे करायला गेलात तर डोकी फुटल्याशिवाय राहणार नाही. सर्व तपास यंत्रणा बाजूला ठेवा आणि एकतरी शिवसैनिक फोडून दाखवा, अशा शब्दात उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदेसेनेला इशारा दिला.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या ‘शिवबंधन’ कार्य अहवालाचे प्रकाशन ठाकरे यांच्या हस्ते शुक्रवारी यशवंतराव चव्हाण सेंटर येथे झाले. दानवे यांनी वेरूळ येथील लेण्यांची प्रतिकृती ठाकरेंना देऊन स्वागत केले. बाजीप्रभू, तानाजी यांच्या निष्ठेला शिवबंधन म्हणतात. जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे आणि जनतेच्या मागे उभे राहण्याचे विरोधी पक्षनेत्याचे काम दानवे करत आहेत, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री पदासाठी सुरू असलेल्या रस्सी खेचीला काहीजण बाळासाहेबांचे विचार म्हणत आहेत. त्यांच्याकडे बघून कोणाला प्रेरणा मिळत असेल तर त्यांनी खुशाल जावे. निवडणुकीपूर्वी सरकारने लाडक्या बहिणींना ओवाळणी दिली. पण, मतदान झाले आणि ते बहिणींना विसरले. त्या योजनेमधून ५ लाख महिलांना वगळले जाणार आहे. त्यामुळे या सरकारला बहिणींनी जाब विचारायला हवा, असे त्यांनी सांगितले.
बोगस मतदार घुसवले आणि मतदान केले
राज्य सरकारनेच बांगलादेशींना रेशनकार्ड दिल्यामुळे त्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. आता आधारकार्ड दिले जात आहे. बोगस आधारकार्डाच्या आधारे निवडणुकीत बोगस मतदान झाले. लोकसभेत ज्या मतदारसंघात कमी मते मिळाली तेथे बोगस मतदार घुसवले गेले. त्यांनी केलेल्या मतदानामुळे त्यांचा झालेला हा विजय खोटा आहे. लोकशाहीची हत्या करून त्यांनी विजय मिळवला, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.