( संगमेश्वर / प्रतिनिधी )
संगमरत्न फाउंडेशन आयोजित शनिवार रविवार दिनांक २५ आणि २६ जानेवारी २०२५ रोजी किल्ले प्रचितगडावर ४५ दुर्गप्रेमींसह प्रथमच श्रमदान मोहीम आयोजित करण्यात आली होती, गडकरी परिवार संस्थेचे मंडळी सुद्धा मोहिमेत उपस्थित होते.
महाराष्ट्रातील ऐतिहासिक किल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी प्रारंभ केलेली ” गड श्रमदान मोहीम ” यशस्वीपणे पूर्ण झाली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून किल्ल्यांच्या पायथ्यापासून ते शिखरापर्यंत विविध संरक्षण उपाययोजना राबवण्यात आल्या. या मोहिमेत स्थानिक प्रशासन, स्थानिक मंडळ, इतिहास संशोधक, स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य, आणि स्थानिक समुदायाचा सक्रिय सहभाग महत्त्वपूर्ण ठरला आहे.
▪️श्रमदान मोहिमे दरम्यान करण्यात आलेली कामे
‣ पायथा गावातून गडाकडे जाणाऱ्या वाट दगडांवर रंगाने दिशादर्शक खुणा करण्यात आल्या.
‣ गडाचा मुख्य दरवाजा मधील माती आणि दगड बाजूला केले गेले.
‣ गडावरील वाढलेली झाडी झुडपे साफ कऱण्यात आली.
‣ गडावरील श्री भैरी भवानी मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला.
‣ गडावरील कातळ कोरीव खांब टाके जवळील परिसर साफ करण्यात आला.
‣ गडावरील वाटा झाडेझुडपे वेढलेल्या होत्या त्या मोकळ्या करण्यात आल्या.
सह्याद्रीच रौद्रभीषण रुप अनुभवायच असेल तर प्रचितगड किल्ल्यावर एकदा तरी जायलाच पाहिजे . किल्ल्यावर जाताना लागणार घनदाट जंगल, ७० ते ८० अंशात चढणारी दमछाक करणारी घसरडी पाउलवाट, अडचणीच्या जागी लावलेल्या शिड्या किल्ल्याची दुर्गमता अधोरेखित करतात. या मोहिमेत मुख्य काम पूर्ण गेले ते म्हणजे पूर्णतः मातीखाली गेलेला गडाचा दरवाजा. खिंडी मधून शिडी वापर करून गडाकडे येताना कातळात कोरलेल्या १० ते १२ पायऱ्या चढल्यानंतर दरवाजाचे अवशेष दिसतात.दरवाजाची कमान अस्तित्वात दिसत नसली तरी कमान ज्या खांबांवर उभी होती ते खांब आहेत. दरवाजा उत्तराभिमुख असून दरवाजावर शिल्पकाम होते की नाही हे समजून येत नाही. दरवाजा जवळ जवळ ५-६ फूट दगड माती खाली गेला होता.त्यावरील दगड आणि माती बाजूला करण्यात आली.हळू हळू एक एक पायरी मोकळी होऊ लागली ,बघता बघता दरवाजा मोकळा होऊ लागला, हे पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील किल्ला, महाराणी येसूबाई याच्या शृंगारपूर गावाजवळून ५४० मी. उंचीवर आहे. प्रचितगड या किल्ल्याचा उचितगड या नावाने अनेक ऐतिहासिक कागदपत्रांत उल्लेख आलेला दिसतो. सूर्यराव सुर्वे हे संगमेश्वर व शृंगारपूर या भागाचे आदिलशाहाचे सरदार होते. त्यांच्या अंमलाखाली शृंगारपूर व प्रचितगड होता. छ. शिवाजी महाराजांनी एप्रिल १६६१ मध्ये सूर्यराव सुर्वे यांच्यावर स्वारी करून प्रतिचगड जिंकून घेतला. छ. शिवाजी महाराजांनी प्रचितगड घेतल्याचे उल्लेख शिवभारत, जेधे शकावली व शिवचरित्र प्रदीप या ग्रंथांमधे येतात. परंतु सभासद बखरीमध्ये छ. शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांच्या यादीमध्ये प्रचितगडचे नाव येते. याचा अर्थ असा की, किल्ला महाराजांनी बांधला; परंतु काही काळ तो सुर्व्यांकडे होता व नंतर परत महाराजांनी तो घेतला. छ. संभाजी महाराजांच्या काळात प्रचितगड हा स्वराज्यातच होता, कारण छ. संभाजी महाराजांचा मुक्काम प्रचितगडच्या पायथ्याशी असलेल्या शृंगारपूरमध्ये अनेक वेळा झालेला होता. किल्ल्यांवरील वास्तू व इतर अवशेष पाहून किल्ला कधीच मोगलांकडे किंवा मुस्लिम सत्ताधीशांकडे गेला नसावा. मराठी साम्राज्याच्या अस्तानंतर ब्रिटिश लष्करी अधिकारी कर्नल प्रॉथरने किल्ला जिंकून घेतला (१८१८). किल्ला जिंकल्यावर तो पाडल्याचे उल्लेख येतात; परंतु किल्ला न पाडता किल्ल्यावर जाणारे रस्ते सुरुंग लावून उडविण्यात आले.
प्रचितगड श्रमदान मोहीम साठी स्थानिक विद्यमान आमदार श्री शेखर गोविंदराव निकम यांसकडून मोलाचे मार्गदर्शन व आर्थिक सहकार्य करण्यात आले. शृंगारपूर ग्रामपंचायत सरपंच श्री विनोद पवार यांसकडून वेळोवेळी श्रमदानसाठी लागणारे साहित्य, परवानगी बाबत मोलाचे सहकार्य मिळाले. शृंगारपूर ग्रामविकास मंडळ – मुंबई चे अध्यक्ष अनिल चव्हाण ,सरचिटणीस प्रमोद.द. बिर्जे , मंडळ आणि पदाधिकारी यांस कडून मोहिमेत सहभागी झालेल्या सर्वांसाठी रविवार म्हणजेच दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणाची व्यवस्था केली होती.शनिवार पहिल्या दिवशी विनोद म्हस्के यांसकडून नाश्ता व्यवस्था करण्यात आली होती. सदर मोहिमेला आर्थिक आवाहना नुसार काही रक्कम जमली होती.
प्रचितगड श्रमदान मोहीमसाठी इतिहास अभ्यासक सागर सुर्वे, आशुतोष बापट, दुर्गवीर संस्थापक संतोष हसुरकर, इत्यादी मंडळींने मोहीम बाबत शुभेच्छा व मार्गदर्शन केले. प्रचितगड मोहीम सोशल मीडिया मार्फत जास्तीत जास्त शिवप्रेमी पर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने मोहिमेत यूट्युबर सागर मदने, कोकणकर अविनाश अविनाश घडशी, कोकणी निखिल कु.निखिल सकपाळ, नोबेल वर्ल्ड रेकॉर्ड मानकरी नितीन जोरे, सोशल मीडिया स्टार कु. रोहित गाडवे, कु. प्रशांत मोहिते, युवाशाहिर अभिषेक पाटील, इत्यादी मंडळी आवाहन व्हिडिओ मार्फत व प्रत्यक्ष मोहिमेत उपस्थित होते.
मोहिमेच्या यशस्वीतेमुळे प्रचितगड व इतर किल्ल्यांची संरचना टिकवून ठेवता येईल, आणि त्यांचा पर्यावरणीय व सांस्कृतिक वारसा जपला जाऊ शकतो. सर्व सहभागी लोकांचे आणि ज्यांनी आपल्या अथक मेहनतीने या मोहिमेला यश प्राप्त करून दिले त्यांचे ‘संगमरत्न फाऊंडेशन ‘ तर्फे आभार व्यक्त करण्यात आले. रत्नागिरी जिल्हामध्ये तसेच शिवप्रेमींच्या कडून मोहिमेची चर्चा आणि मोहिमेच्या यशस्वीतेबद्दल अभिमान व्यक्त केला जात आहे.