( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
तालुक्यातील गणपतीपुळे ग्रामपंचायतच्या सरपंच व ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अखेर ग्रामपंचायतच्या विरोधात नारळ पाणी विक्रेते शरद मयेकर यांनी त्यांच्या पत्नीसह शुक्रवारी, २७ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी दहा वाजल्यापासून आमरण उपोषण सुरू केले होते. मात्र उपोषणादरम्यान शनिवारी (दिनांक २८ डिसेंबर) सकाळी मयेकर यांची तब्येत खालावली. त्यांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. सुरू असलेले उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे उपोषणकर्त्या आदिती मयेकर यांनी सांगितले आहे.
गेल्या वीस वर्षांपासून समुद्र किनारी पती पत्नी नारळ पाणी आणि भेळपुरी विक्री व्यवसाय करतात. उदरनिर्वाह याच व्यवसायावर अवलंबून असल्याने गेले काही दिवस उपासमारीची वेळ मयेकर कुटुंबियांवर येऊन ठेपली. कोरोना कालावधीत व्यवसाय ठप्प होता, त्यावेळीं मयेकर यांनी कसेबसे दिवस काढले. समुद्र किनाऱ्यावरील नारळपाणी व्यवसाय हा पर्यटकांवर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. त्यामुळे मयेकर दाम्पत्याला केवळ सहा महिन्यांचा कालावधी मिळतो. मात्र ऐन सिजनमध्येच मयेकर यांना व्यवसायाची परवानगी ग्रामपंचायतने नाकारल्याने या अन्यायकारक भूमिकेविरोधात मयेकर दाम्पत्यांने संविधानिक मार्ग अवलंबून ग्रामपंचायतच्या समोरच शुक्रवार सकाळपासून उपोषण छेडले. चोवीस तासांहून अधिक काळ उलटला तरीही स्थानिक प्रशासनाने दखल घेतली नाही. अन्न पाण्याविना न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मयेकर यांची शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास तब्येत खालावली. तत्काळ मयेकर यांना तेथील रुग्णालयात नेण्यात आले, तिथून त्यांना रत्नागिरी येथील जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. सध्या मयेकर यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे उपोषण तात्पुरते स्थगित करत असल्याची माहिती आदिती मयेकर यांनी दिली आहे.

गटविकास अधिकारी घेणार बैठक
दरम्यान पाच ते सहा दिवसांनी याबाबत बैठक घेण्यात येणार आहे. ही बैठक गटविकास अधिकारी जे पी जाधव यांच्या माध्यमातून होणार आहे. या बैठकीला गणपतीपुळे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक, सरपंच हे उपस्थित राहतील असे गटविकास अधिकारी म्हणल्याचे अदिती मयेकर यांनी सांगितले. तसेच या प्रकरणात रत्नागिरी पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी देखील लक्ष घातल्याचे आदिती मयेकर यांनी सांगितले. मात्र आयोजित बैठकीत गटविकास अधिकारी कोणती न्यायिक भूमिका घेणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.