(रत्नागिरी / प्रतिनिधी)
राज्यातील महामार्गांवर आणि घाटरस्त्यांवर वाहनांसाठी निश्चित वेगमर्यादा असतानाही, वाहनचालक या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे निवळी येथील अपघातग्रस्त गॅसवाहू टँकर. स्थानिकांच्या मते, टँकरचा वेग त्या वेळी ताशी ६० ते ७० किमी इतका होता, जो घाटरस्त्यासाठी निश्चित केलेल्या ४० किमी वेगमर्यादेपेक्षा अधिक होता.
वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्यामुळे अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने याबाबत कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. नियमबाह्य वेगाने वाहन चालविल्यामुळे वाहनचालक, सहप्रवासी आणि इतर नागरिकांचे जीव धोक्यात येत आहेत.
कायदा काय सांगतो?
राज्याचे अप्पर पोलिस महासंचालक (वाहतूक) यांनी मोटार वाहन अधिनियम १९८८ अंतर्गत कलम ११२ नुसार वेगमर्यादा निश्चित केल्या आहेत. तसेच, सर्वोच्च न्यायालयाने रस्ते अपघात आणि मृत्यूदरात दरवर्षी १०% घट व्हावी, यासाठी धोरणात्मक उपाययोजनांचे निर्देश दिले आहेत. राज्यातील सुमारे ३०% अपघात हे अतीवेगामुळे घडतात, असे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.
अशी आहे वेगमर्यादेची संरचना:
एम १ श्रेणीतील ८ प्रवाशांच्या वाहतुकीसाठी वापर होणाऱ्या वाहनांना द्रुतगती मार्गावर समतल भागात ताशी १०० किमी, घाटमाथ्यावर ५० किमी, राष्ट्रीय महामार्गावर समतल भागात ९० तर घाटामध्ये ५० किमी तर शहरी भागात ६० ते ४० वेगमर्यादा आहे. प्रवासी मोटारवाहन ज्यामध्ये ९ किंवा त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहतूक होते त्या वाहनांना द्रुतगती मार्गावर समतल भागात ८०, घाटात ४०, महामार्गावर समतल भागात ८०, घाटात ४० तर शहरी भागात ५० ते ३० किमी वेगमर्यादा आहे. माल व सामान वाहतुकीच्या वाहनांसाठी द्रुतगती मार्गावर समतल भागात ८० तर घाटात ४०, राष्ट्रीय महामार्गावर समतल भागात ८० तर घाटात ४० पालिका भागात ताशी ४० ते ३० किमी अशी वेगमर्यादा घालून दिली आहे.
वाहनचालकांनी वेगमर्यादेचे काटेकोर पालन केल्यास अनेक अनर्थ टाळता येऊ शकतात. प्रशासनाने देखील वेगमर्यादेच्या अंमलबजावणीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कारवाई अधिक प्रभावी करण्याची गरज आहे.