( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
साखरपा येथे वंचित बहुजन आघाडी जिल्हा व दाभोळे जिल्हा परिषद गटाच्या वतीने बुधवारी, (दिनांक २५ डिसेंबर २०२४) महिला मुक्ती दिनानिमित्त भारतीय महिला मुक्ती परिषद कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गौतम गमरे यांनी भूषविले. या भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेला विशेष मार्गदर्शक प्रेरणा संस्थेच्या जिल्हा समन्वयक अश्विनी कांबळे उपस्थित होत्या. तसेच महिला जिल्हाध्यक्षा बेटकर मॅडम, भारतीय बौद्ध महासभा सरचिटणीस एन बी कदम, संस्कार विभाग प्रमुख विजय जाधव, संगमेश्वर तालुकाध्यक्ष राजेंद्र मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना जिल्हा महासचिव मुकुंद सावंत म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती दहन करून स्त्रियांना गुलामगिरीतून मुक्त केले.हा दिवस भारतीय स्त्री मुक्ती चळवळीचा महत्त्वाचा दिवस आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून देशभर हा दिवस स्त्री मुक्ती दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या स्त्री मुक्ती परिषदेत एकूण सहा ठराव पारित करण्यात आले. यामध्ये २५ डिसेंबर मनुस्मृती दहन दिवस हा भारतीय स्त्री मुक्ती दिन म्हणून जाहीर करावा, गृहमंत्री अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा ताबडतोब राजीनामा द्यावा,परभणी येथे संविधानाचे शिल्प फोडण्याच्या घटनेचा भारतीय स्त्री-मुक्ती दिन परिषद तीव्र निषेध करत आहे, महिलांचा सन्मान सुरक्षिता आणि सक्षमीकरण या उद्देशानेच महिलांसाठी योजना आखल्या पाहीजे, भाजप सरकार ने आणलेल्या ” एक देश एक निवडणुक ” पध्दतीला आम्ही विरोध करतो, कृषी मालाला हमी भाव मिळालाच पाहीजे. असे सहा महत्वाचे ठराव एकमताने भारतीय स्त्री मुक्ती दिन संयोजन समिती आयोजित २९ वी भारतीय स्त्री मुक्ती दिन परिषदेत करण्यात आले.
विशेष मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या अश्विनी कांबळे यांनी महिलांना संबोधित करताना म्हटले की, स्वातंत्र’ म्हणजे काय? ‘ स्व’ तंत्राने जगणे म्हणजे स्वतंत्र. अशी पारिभाषिक संज्ञा केली. एकोणीसाव्या शतकामध्ये शाहू, फुले ,आंबेडकरांनी स्त्री मुक्तीची चळवळ उभारली. डॉ. बाबासाहेबांनी दिलेले मार्ग, कायदे आजच्या स्त्रियांना बलशाली बनवत आहेत. असे विविध मुद्दे उपस्थित करत त्यावर परखड आपले विचार मांडून त्यासंदर्भात उदाहरणेही दिली. डॉ बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी महिलामंधील सामाजिक क्रांती ही झालेली नाही. याची विविध कारणे आहेत मात्र स्वातंत्र्यबाबतचा जो विचार आहे तो अजून ही महिलांमध्ये विकसित झालेला नाही,किंवा तितकासा कळेला नाही. एखादी गोष्ट कळलेली नाही किंवा समजलेली असते परंतु तिकडे आपण वळत नाही, किंवा आपल्यापर्यंत ती गोष्ट पोहोचलेली नसते. सध्या मनूचा कायदा हा केवळ भाषणांपुरता मर्यादित राहिला. मात्र संविधान जगण्याचा आनंद हा आपल्याला केव्हा कळेल तर मनुचा कायदा कळेल, त्यावेळीच भारतीय संविधानातील निर्माण केलेले कायदे प्रत्येकाला समजतील असे प्रतिपादन अश्विनी कांबळे यांनी केले.
जिथे भेदाभेद विषमता असणारी दरी आहे तेथील महिला प्रगती करू शकत नाही डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेले वाक्य हे आजही इतकी वर्ष उलटली तरी तंतोतंत लागू होत आहे. महिलांनी सध्याच्या काळात यशस्वी वाटचाल कशी करावी यावर बोलताना सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले या फुले दाम्पत्यांचां पुण्यात एका वृत्तपत्राच्या माध्यमातून केलेल्या सत्काराचा किस्सा सांगून सध्याच्या परिस्थितीला महापुरुषांचे विचार रीलेट केले तर वेगळे होऊ शकते का…तर नाही परिस्थिती तिचं आहे, प्रश्न तेच आहे. त्यामुळे काम करण्याची पद्धत जी महापुरुषांनी केली ती डिजिटलायसेशनच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. असे ही त्या म्हणाल्या.
डॉ बाबासाहेबांनी दिलेला बुद्ध, बाबासाहेबांनी दिलेले विचार, आणि आपले आचरण ह्या सर्व गोष्टी प्रत्येकाने आपल्या जगण्यात आणल्या पाहिजे. परिवर्तनाच्या चळवळीमध्ये आपल्याकडे महापुरुषांच्या विचारांशिवाय पदोपाय नाही , यामुळे सर्वांनी वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून आणि एकनिष्ठ राहून पुढे जाऊया असेही आवाहन स्त्री मुक्ती परिषदेतून अश्विनी कांबळे यांनी केले.
यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे सरचिटणीस एन बी कदम, विजय जाधव यांनी देखील सुंदर शब्दात उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साक्षी कांबळे, शीतल कांबळे, आसावरी कदम, जिल्हा उपाध्यक्ष लवेष कांबळे, प्रितेष कांबळे, प्रणय कांबळे, भिकाजी कांबळे, संदीप कांबळे, महेंद्र कांबळे आदींनी परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप कांबळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयदीप कांबळे यांनी केले.