(रत्नागिरी)
जयगड परिसरातील जिंदाल कंपनी परिसरामध्ये झालेल्या वायूगळतीमुळे जयगड विद्यामंदिर मधील जवळपास ३० मुले अत्यवस्थ झाली असून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरीकडे हलविले आहे.
जयगड येथील जेएसडब्ल्यू कंपनी परिसरात बाहेर पडलेल्या वाफेमुळे नांदिवडे येथील एका शाळेतील ३० ते ३५ मुलांना उलटी, मळमळ, डोळ्यातून पाणी येण्याचा त्रास झाला. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणाचा तपास आणि चौकशी करू, अशी माहिती प्रांताधिकारी जीवन देसाई यांनी दिली आहे.
जयगड वायू गळती प्रकरणाशी आमचा
कोणताही संबंध नाही : JSW ENER
जयगड येथील माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वायू गळतीमुळे झालेल्या त्रासाशी आमचा कोणताही संबंध नाही असे JSW ENERGY कडून पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे.
गुरुवार दुपारी जयगड येथील माध्यमिक विद्यालयातील तब्बल ६० विद्यार्थ्यांना वायूचा वास पसरल्याने मळमळ, पोटदुखी, उलटी, श्वास घेता न येणे असे त्रास सुरु झाले . या शाळेशेजारी JSW कंपनीचे काम चालते. परिसरात काम सुरु असताना ही वायू गळती झाली आणि विद्यार्थ्यांना त्याचा त्रास झाला असे पालकांकडून आणि नागरिकांकडून सांगण्यात आले. या विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून तत्काळ रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान या प्रकाराशी संबंधित एक पत्रक JSW ENERGY कडून प्रसार माध्यमांना पाठवण्यात आले. त्यात म्हटल्याप्रमाणे, JSW ENERGY च्या रत्नागिरी येथील थर्मल प्लांटमध्ये कोणतीही गॅस साठवण सुविधा नाही. तसेच जयगड येथील वायू गळती प्रकरणाशी सुद्धा कंपनीचा कोणताही संबंध नाही असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
JSW एनर्जीमध्ये, आम्ही आमचे कर्मचारी, समाज आणि पर्यावरण यांच्या सुरक्षिततेला आणि कल्याणाला प्राधान्य देतो. आम्ही कठोर सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करतो आणि आमच्या कामकाजावर आमचे पूर्ण लक्ष असते, कंपनीकडून सर्वोच्च मानकांची पूर्तता केली जाते. सुरक्षेसाठी आमची बांधिलकी अटूट आहे आणि आजूबाजूच्या जनतेच्या आरोग्यावर आणि सुरक्षिततेवर परिणाम करणारी कोणतीही घटना टाळण्यासाठी आम्ही सर्व खबरदारी घेतो असे या पत्रकात म्हटले आहे.