(संगमेश्वर / एजाज पटेल)
13 ते 18 या वयात मुलगा व मुलीमध्ये अनेक शारिरीक व मानसिक बदल घडून येतात. या वयात मुलांना सांभाळणे फार गरजेचे असते, मुले भावनेच्या आहारी जातात, त्यांना व्यवहारिकता समजत नाही. यास मोबाईलचा अतिवापर कारणीभूत असल्याचे वारंवार उघड झाले आहे. जिल्ह्यात वर्षभराच्या कालावधीत पोलिस स्टेशनमध्ये मुली गायब झाल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.
18 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलीला अल्पवयीन मुलगी संबोधले जाते. अल्पवयीन असताना मुलासोबत मुलगी स्वतःहून पळून जरी गेली असली तरी मुलाविरोधात तिचे अपहरण केल्याचा गुन्हा नोंद केला जातो. पोलिस मुलीचा शोध घेऊन मुलीला वडिलांकडे सुपूर्द करतात. यामुळे मुलाचे आयुष्य मात्र बर्बाद होते. अल्पवयीन मुलीचे अपहरण हा गंभीर गुन्हा मानून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होतो. या कायद्यांतर्गत संबंधित मुलाला पाच वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. प्रेम हे आंधळे असे म्हटले जाते. प्रेमाला वयाचे बंधन नाही. दिवसेंदिवस लग्न झालेल्या महिलासुद्धा प्रियकरासोबत पळून जाण्याच्या घटना वाढत आहेत.
18 व्या वर्षांपर्यंत मुलीमध्ये अनेक शारीरिक व मानसिक बदल घडून येत असतात. कधी कधी मुलांमध्ये चिडचिडपणा वाढलेला असतो. आपल्यासोबत एखाद्या व्यक्तीने मैत्री करावी, असे तिला नेहमी वाटत असते. ही जागा पालकांनी भरून काढली तर मुलगी चुकीचे पाऊल उचलणार नाही. वयानुसार मुलीमध्ये होणा-या बदलांविषयी पालकांनी जागरूक असावे. तिला घरीच माया, प्रेम मिळाले तर ती बाहेरचे प्रेम शोधण्याचा प्रयत्न करणार नाही.
पालकांनी नकळत ठेवावे मुलीकडे लक्ष
आपली मुलगी काय करते, मोबाइलमध्ये काय बघते याविषयी प्रामुख्याने मुलीकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. ती चुकत असेल तर तिला प्रेमाने समजावून सांगावे. खेळ, वाचन या गोष्टीमध्ये तिला मग्न ठेवावे. सोशल मीडिया, मोबाइलच्या माध्यमातून अनोळखी, दूरच्या व्यक्तीसोबतही संपर्क येतो. असा संपर्क टिकवून ठेवणे शक्य असते. अशावेळी भावनेच्या आहारी जाऊन दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडतात. भावनांवर नियंत्रण न राहिल्यास दोघेही पळून जातात. तर अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर मुलींची शारिरीक आणि आर्थिक फसवणूक केली जाते.