(गावखडी /वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील श्रीक्षेत्र पावस गावात शेख महंमद पीर यांचा उरूस शुक्रवार दिनांक 15 नोव्हेंबर पासून प्रारंभ होणार आहे. हजरत महंमद पीर 225 वर्षांपूर्वी पैगंबरवाशी झाले तेव्हापासून त्यांचा उरूस रत्नागिरी कार्तिक पौर्णिमा दिवशी साजरा होत आहे.शेख महंमद पीर ट्रस्टची स्थापना 1952 मध्ये पैगंबरवासी आदमखान महंमदखान फडनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
पावस येथे सालाबाद प्रमाणे शेख महंमद पीर दर्गा उरूस दिनांक 15 नोव्हेंबर 2024 रोजी रात्रौ दहा वाजता मिरवणुकीने येऊन समाधीवर चंदन चढवून सुरूवात होणार आहे. दिनांक 16 नोव्हेंबर 2024 रोजी रात्रौ साडेदहा वाजता शेख महंमद बाबांच्या समाधीवर सामुदायिक पद्धतीने महावस्त्र ( गिलाफ) परिधान करण्यात येणार आहेत. दिनांक 17 नोव्हेंबर 2024 रोजी या उरूसाचा सांगता समारंभ भाविकांना दर्शनासोबत महाप्रसाद रात्रौ. 7ते 10 वाजता देण्यात येणार आहे.
सुमारे तिनशे वर्षापूर्वी मौजे पावस गाव व परिसरातील महसूल सध्या रक्षक सरनाईक, फडनाईक, तानशा, ठाणे नाईक हि मंडळी पावस येथे आली. यापैकी हजरत महंमद पीर होत. ते कुटुंबियांसमवेत पावस कबरस्थानात राहत असत. हजरत महंमद पीर जागृत देवस्थान असून नवसाला पावत असल्यानेच सर्व धर्मीय लोक पावस येथे दरवर्षी नवस फेडायला येतात. येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी चहा,थंड पेय, खाद्यपदार्थ प्रसादाचे साहित्य यांची दुकाने सज्ज असतात. तीन दिवस या उरूस निमित्त त्यांची चांगलीच कमाई होते. या कार्यक्रमाला सर्व धर्मीय तसेच काजी जमात, भुसारवाडी जमात, गोळ्या जमात यांचा प्रामुख्याने सहभाग असतो.
सन 1985 साली हजरत शेख पीर दर्गा इमारत उभारण्यासाठी सरनाईक ईनाउत खान कुटुंबियांचे मोठे सहकार्य लाभले. विश्वस्त मंडळ शेख महंमद पीर दर्गा पावस हे व्यवस्थापन पाहत असून या मंडळाचे अध्यक्ष फैअली हुसेनखान फडनाईक आणि दाऊद महामूद मुजावर आणि ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱी, भाविकांनी या उरूसास उपस्थित रहावे असे आवाहन केले आहे.
फोटो: पावस येथील हजरत महंमद पीर दर्ग्याचे छायाचित्र
(छाया: दिनेश पेटकर, गावखडी)