(वैभव पवार / गणपतीपुळे)
गेल्या अनेक वर्षांपासून क्रिकेट सारख्या खेळात खंडाळा सारख्या ग्रामीण भागातील मुलींच्या क्रिकेट संघांने नावलौकिकप्राप्त आणि विविध पुरस्कार प्राप्त क्रीडा शिक्षक डॉ.राजेश जाधव यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली विशेष प्राविण्य मिळवले आहे. या संघाने क्रिकेट खेळातील आपले वर्चस्व कायम राखताना यंदाही कोल्हापूर विभागात रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी प्राप्त केली आहे. हा संघ येत्या काही दिवसातच रत्नागिरी जिल्ह्याचे कोल्हापूर विभागात रत्नागिरी जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी रवाना होणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
महाराष्ट्र राज्य शिक्षण व क्रीडा संचनालय पुणे यांचे मार्फत घेण्यात आलेल्या गोगटे कॉलेज मैदानात रत्नागिरी जिल्हा शालेय क्रीडा स्पर्धेत U/19 मुलींच्या माध्यमिक विद्यालय भागशाळा व श्रीम.पार्वती शंकर बापट कनिष्ठ महाविद्यालय वाटद खंडाळा येथील संघाने दापोली संघावर 19 धावांनी विजय मिळवला.नाणेफेक जिंकून खंडाळा संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली 3 षटकात सानिया हिने 15धावा तर मनाली निंबरे 14 धावा करून नाबाद राहिल्या.7 धावा बाईज मिळाल्या.तर प्रत्युत्तरादाखल दापोली संघाने 3 षटकात 18 धावाच केल्या.
मनाली निंबरे, सानिया महाकाळ, संचीता जाधव यांनी भेदक गोलंदाजी केली. क्षेत्ररक्षकांची उत्तम साथ मिळाली. या संघात संचिता जाधव (कर्णधार), सानिया महाकाळ, सलोनी धातकर, मनाली निंबरे, जयश्री शितप (WK ), पूजा जाधव, नीधी डाफळे, वैभवी शिंदे, आश्लेषा लोकरे, अक्षता पवार, तन्वी सावंत, पूर्वा सावंत, सानिका आलीम, दिशा डाफळे आदींचा समावेश आहे. हा संघ रत्नागिरी जिल्ह्याचे कोल्हापूर विभागात नेतृत्व करणार आहे. या क्रिकेट संघासाठी क्रीडा शिक्षक राजेश जाधव, पल्लवी बोरकर यांचे विशेष मार्गदर्शन व प्रोत्साहन लाभले आहे.