(रत्नागिरी)
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागातील तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी व्यवसायाभिमुख कौशल्य अभ्यासक्रमांतर्गत भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरील स्वच्छतेबाबत प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल सादर केला आहे. या अहवालात किनाऱ्यावरील कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषण आणि पर्यटकांच्या सवयींचा अभ्यास करत समुद्रकिनारा कायमस्वरूपी स्वच्छ व निसर्गरम्य ठेवण्यासाठी विविध व्यावहारिक उपाययोजना सुचविण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) २०२० नुसार विषयज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित होणे आवश्यक असल्याने समाजशास्त्र विभागाने ‘सामाजिक शास्त्रातील संशोधन पद्धती’ हा कौशल्याधारित अभ्यासक्रम राबविला आहे. सर्वेक्षण, मुलाखत, संशोधन आणि अहवाल लेखनाची कौशल्ये विकसित करणे हा या अभ्यासक्रमाचा प्रमुख उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी भाट्ये समुद्रकिनाऱ्याला भेट देऊन कचरा व्यवस्थापन, प्लास्टिक प्रदूषण आणि पर्यटकांच्या वर्तनाचा प्रत्यक्ष अभ्यास केला. यावेळी स्थानिक व्यावसायिक, पर्यटक तसेच स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या मुलाखती घेऊन माहिती संकलित करण्यात आली. या माहितीच्या विश्लेषणातून विद्यार्थ्यांनी केवळ समस्या अधोरेखित न करता किनारा कचरामुक्त ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचाही अहवालात समावेश केला आहे.
सर्वेक्षणादरम्यान किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांचे कप, प्लास्टिकचे चमचे, खाद्यपदार्थांची वेष्टने, गुटख्यांची पाकिटे, थर्माकोलच्या डिशेस, समुद्रातून वाहून आलेले जुने मासेमारीचे जाळे, नायलॉनच्या दोऱ्या तसेच फुटलेल्या काचेच्या बाटल्या आढळून आल्या. या काचेच्या बाटल्यांमुळे पर्यटक आणि स्थानिक मच्छीमारांना दुखापत होण्याचा धोका असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले.
पर्यटकांकडून कचराकुंडीचा वापर न करणे आणि किनाऱ्यावर पुरेशा संख्येने डस्टबीन उपलब्ध नसणे ही कचरा साचण्यामागील प्रमुख कारणे असल्याचे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले.
अहवालात भाट्ये किनाऱ्यावर ‘नो प्लास्टिक झोन’बाबत व्यापक जनजागृती करणे, ओला व सुका कचरा वेगळा टाकण्यासाठी ठिकठिकाणी डस्टबीनची व्यवस्था करणे, तसेच स्थानिक व्यावसायिकांच्या सहकार्याने ‘कचरामुक्त किनारा समिती’ स्थापन करण्याची शिफारस करण्यात आली आहे. याशिवाय नागरिक आणि पर्यटकांनी स्वच्छतेच्या नियमांचे काटेकोर पालन करून समुद्रकिनारा कचरामुक्त ठेवण्यासाठी सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
हा उपक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कला शाखेच्या उपप्राचार्या डॉ. कल्पना आठल्ये, वाणिज्य शाखेच्या उपप्राचार्या डॉ. सीमा कदम आणि विज्ञान शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी यांच्या सहकार्याने पार पडला. प्रा. सचिन सनगरे, प्रा. अभिजित भिडे, प्रा. निलेश जोशी, प्रा. सारिका माळी, प्रा. मनस्वी लांजेकर आणि डॉ. विराज चाबके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दरम्यान, भारत सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालय आणि ओशन सोसायटी ऑफ इंडिया (कोची) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय सागरकिनारा स्वच्छता अभियानातही गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाने सक्रिय सहभाग नोंदविला. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या माध्यमातून समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता, कचऱ्याचे प्रकारनिहाय वर्गीकरण, मापन आणि पुढील व्यवस्थापनाचे नियोजन करण्यात आले.
ग्लोबल वॉर्मिंग आणि वाढते सागरी प्रदूषण या पार्श्वभूमीवर देशभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानात महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केलेले संशोधन आणि सामाजिक योगदान किनारपट्टी संवर्धनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असून त्यांच्या कार्याचे शैक्षणिक क्षेत्रासह पर्यावरणप्रेमींकडूनही कौतुक होत आहे.

