(रत्नागिरी)
शहरातील जोशी पाळंद भागात एका ५० वर्षीय प्रौढाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शनिवार, दिनांक ३१ जानेवारी रोजी सकाळी सुमारे ९ वाजता उघडकीस आली.
केदार श्रीकृष्ण जोशी (वय ५०, रा. जोशी पाळंद, रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या प्रौढाचे नाव आहे. केदार जोशी हे विवाहित असून फॅब्रिकेशन व्यवसायात कार्यरत होते. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून केदार जोशी यांनी सिलिंग फॅनला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. सकाळी सुमारे ९ वाजता त्यांचा भाऊ घरी आला असता केदार जोशी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
याबाबत तातडीने शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला व पुढील तपासासाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला. या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास सुरू आहे.

