(रत्नागिरी)
नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांनंतर आता संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या निकालांकडे केंद्रित झाले आहे. राज्यभरातील 288 नगरपरिषदा, नगरपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया आज रविवारी (21 डिसेंबर) पार पडणार आहे.विधानसभा निवडणुकीत मिळवलेलं मोठं यश महायुती कायम राखणार का? की महाविकास आघाडी बाजी मारणार? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. नगरपरिषद आणि नगर पंचायतींच्या अध्यपदांसाठी यंदा थेट निवडणूक होत आहे. त्यामुळे शहरांचा कारभारी कोण होणार? याकडेही जनतेचं लक्ष लागलं आहे. मतदानाची प्रक्रिया पूर्ण होत असताना नागरिकांच्या मनात एकच प्रश्न आहे, मतमोजणी नेमकी किती वाजता सुरू होणार आणि आपल्या प्रभागाचा निकाल कधी कळणार? या संदर्भात राज्य निवडणूक आयोगाने सविस्तर वेळापत्रक जाहीर केले असून, मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र निवडणूक प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी नियमभंग झाल्याच्या तक्रारी दाखल झाल्या. विशेषतः काही नगरपरिषदांमध्ये उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेण्यासाठी आवश्यक कालावधी न देता थेट निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. ही प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.
या प्रकरणांवर अपील दाखल झाल्याने संबंधित ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. नियमानुसार 22 नोव्हेंबरपर्यंत निकाल अपेक्षित होते, मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या. परिणामी, राज्यातील 23 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्ष व सदस्य पदांसाठी तसेच विविध ठिकाणच्या 143 रिक्त सदस्य पदांसाठी मतदानाची नवीन तारीख निश्चित करण्यात आली.
या सर्व जागांसाठी शनिवार, 20 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे मतमोजणी. राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, सर्व संबंधित नगरपरिषदा आणि नगरपंचायतींची मतमोजणी आज (रविवार, 21 डिसेंबर 2025) रोजी होणार असून सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाईल.
मतमोजणी केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असून निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत संपूर्ण प्रक्रिया पार पडणार आहे. सुरुवातीला पोस्टल मतदानाची मते मोजली जातील, त्यानंतर ईव्हीएममधील मतांची मोजणी सुरू होईल. टप्प्याटप्प्याने प्रभागनिहाय निकाल जाहीर केले जाणार आहेत.
मतमोजणीच्या दिवशीच बहुतांश प्रभागांचे निकाल स्पष्ट होण्याची शक्यता असून, निकाल जाहीर होताच संबंधित नगरपरिषद किंवा नगरपंचायतीतील सत्तास्थिती आणि राजकीय चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे आज (21 डिसेंबर) रोजी सकाळी 10 वाजल्यापासून नागरिक, उमेदवार आणि राजकीय पक्षांचे लक्ष निकालांकडे लागून राहणार आहे.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील 4 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायतींच्या निवडणुका ऐतिहासिक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आता पुन्हा लोकप्रतिनिधींच्या हाती जाणार आहे. आज, रविवारी या सातही संस्थांची मतमोजणी होणार असून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष निकालांकडे लागले आहे.
रत्नागिरी, राजापूर, चिपळूण आणि खेड नगरपरिषदांवर डिसेंबर 2021 पासून, तर गुहागर आणि देवरुख नगरपंचायतींवर मे 2023 पासून प्रशासक नियुक्त होते. शिवाय, लांजा नगरपंचायतीवर फेब्रुवारी 2025 मध्ये प्रशासक आले होते. बऱ्याच वर्षांनंतर या नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुका पार पडत असल्याने, या निवडणुका रत्नागिरी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक मानल्या जात आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सोमवारपासून लोकप्रतिनिधी पुन्हा एकदा या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार सांभाळताना दिसतील.

