(गणपतीपुळे / वैभव पवार)
बलाढ्य दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघावर वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने विजय मिळवत विश्वविजेतापद प्रथमच प्राप्त केले आहे. याच विश्वविजेता महिला क्रिकेट संघाला गोलंदाजीचे धडे देणारे प्रशिक्षकअविष्कार साळवी हे मालगुंड गावचे सुपुत्र असल्याने संपूर्ण मालगुंडवासियांची मान त्यांच्या प्रशिक्षणातील कामगिरीबद्दल उंचावली आहे.
महिला भारतीय क्रिकेट संघाचे बॉलिंग कोच (प्रशिक्षक) अविष्कार साळवी हे मालगुंड गावाचे सुपुत्र असल्याने त्यांनी मालगुंड गावाचे नाव संपूर्ण जगभरात पोचवले आहे. तसेच भारतीय महिला क्रिकेट संघाला ऐतिहासिक यश मिळवून देण्यात त्यांचा लाखमोलाचा वाटा ठरला आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक आणि गोलंदाजी प्रशिक्षक यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळेच यंदा वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने सर्वच क्षेत्रात आपली कामगिरी चमकदार व लक्षणीय करून तब्बल 52 वर्षानंतर विश्वविजेतेपदाचा मान पटकावला आहे.
या संघाला संघाला गोलंदाजी मध्ये विशेष प्रशिक्षण देऊन मूळचे मालगुंड गावचे रहिवासी असलेल्या आविष्कार साळवीनी सर्वोत्तम गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली पात्रता सिद्ध केली आहे .वर्ल्ड कपच्या भारतीय संघाच्या यशानंतर विजयाचे स्टेटस प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मोबाईलवर झळकत आहेत. अगदी त्याच प्रकारे भारतीय महिला क्रिकेट संघाला गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून लाभलेल्या अविष्कार साळवींचे स्टेटस देखील संपूर्ण मालगुंडवासियांच्या मोबाईलवर झळकत आहेत. अविष्कार साळवी हे खेळाडू म्हणून आणि विशेषत: एक गोलंदाज म्हणून भारतीय संघात तत्कालीन प्रसिद्ध क्रिकेट खेळाडू सौरभ गांगुलींच्या नेतृत्वाखालील भारतीय संघातून वर्ल्डकप मध्ये खेळण्याचा मान पटकावला होता. त्यानंतरच्या काळात आपली खेळाडू म्हणून कारकीर्द थांबवून भारतीय महिला क्रिकेट संघासाठी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून आपली कामगिरी बजावली आहे. त्यामध्ये भारतीय महिला क्रिकेट संघातील गोलंदाजांना गोलंदाजीचे परिपूर्ण धडे देऊन त्यांनी वर्ल्डकप मध्ये सरस कामगिरी करण्यात भाग पाडले आहे.
या कामगिरीमुळेच त्यांची भारतीय महिला क्रिकेट संघामध्ये एक उत्तम गोलंदाज प्रशिक्षक म्हणून आता ख्याती निर्माण झाली असून संपूर्ण मालगुंडवासियांसाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे. तसेच संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यासाठी ही अभिमानास्पद कामगिरी ठरली असून अविष्कार साळवींचे संपूर्ण जिल्ह्यातून आणि विशेषतः मालगुंडमध्ये खास अभिनंदन होत आहे.

