(मुंबई)
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने राज्यभर ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ या विशेष तपासणी मोहिमेची अंमलबजावणी सुरू केली आहे. नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्न उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात आलेल्या या मोहिमेत आतापर्यंत ३,४८५ अन्न दुकानांची तपासणी करण्यात आली आहे.
या तपासणीदरम्यान १,५०० हून अधिक दुकानांना नोटीस देण्यात आली असून ४८ दुकानांचे परवाने रद्द, तसेच १,४३१ आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
अभियानादरम्यान दूध, खवा/मावा, तूप, खाद्यतेल, मिठाई, ड्रायफ्रूट्स, चॉकलेट्स, भगर आणि इतर अन्नपदार्थांचे ४,६७६ नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. तपासणीत अनियमितता आढळल्याने ४८ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले, तर एका आस्थापनेचा परवाना रद्द करण्यात आल्याची माहिती विभागाने दिली आहे.
हे अभियान ११ ऑगस्ट ते २५ ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यभर राबवले जात आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम, सचिव धीरज कुमार, तसेच आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू आहे.
विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, सणासुदीच्या काळात अन्नपदार्थ खरेदी करताना त्यावरील गुणवत्ता, पॅकिंगवरील माहिती आणि परवाना क्रमांक तपासूनच खरेदी करावी. भेसळीचा संशय आल्यास त्वरित जवळच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

