(रत्नागिरी)
रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालयाच्या नव्या प्रशस्त वास्तूमध्ये आज विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर ग्रंथपूजन पार पडले. दीपक पटवर्धन यांनी या वेळी वाचनालयाला “नव्या युगाचे बहुविध ज्ञान आणि संस्कृती केंद्र” म्हणून विकसित करण्याचा संकल्प व्यक्त केला.
९ महिन्यात भव्य तळमजल्याचे बांधकाम पूर्ण
डिसेंबर २०२४ मध्ये ग्रंथसंपदा बाहेर काढून वाचनालयाच्या इमारतीचे नूतनीकरण सुरू झाले होते. केवळ ९ महिन्यांत तब्बल ४,००० चौ.फु. चे बांधकाम पूर्ण करून तळमजला वापरासाठी सज्ज करण्यात आला आहे. आजच्या सोहळ्यातील वैशिष्ट्य म्हणजे वाचनालयातील १ लाख पुस्तकांपैकी तब्बल ७२ हजार पुस्तके नव्या इमारतीत स्थानापन्न करण्यात आली.
२०० वर्षांच्या उंबरठ्यावर नवी वाटचाल
जवळपास दोन शतकांचा इतिहास असलेले हे वाचनालय आता नव्या शतकात प्रवेश करत आहे. पुढील ३०० वर्षांची वाटचाल सुकर होण्यासाठी अत्याधुनिक सुविधा असलेली भव्य वास्तू उभी राहत आहे.
ज्ञान व संस्कृतीचे केंद्रबिंदू
प्रशस्त कार्यालय, डिजिटल रूम, पुस्तकांच्या उत्तम मांडणीची सोय, वाचकांसाठी आरामदायी बैठक व्यवस्था, भरपूर प्रकाश आणि हवेशीर वातावरण — या सर्व सुविधा वाचकांना एक वेगळा अनुभव देणार आहेत.
२ कोटींच्या घरात खर्च; निधी उभारणीचा यशस्वी प्रयत्न
या भव्य इमारतीच्या उभारणीसाठी सुमारे २ कोटी रुपयांचा निधी उभारण्यात आला आहे. कोणत्याही सार्वजनिक संस्थेला अभिमान वाटावा अशी ही उभारणी झाल्याचे समाधान दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केले.
१२ ऑक्टोबरपासून नियमित वाचनालय सुरू
१२ ऑक्टोबर रोजी वाचनालयाचा तळमजला पूर्णपणे सज्ज होऊन वाचनालयाचे नियमित कामकाज नव्या वास्तूत सुरू होणार आहे.
मान्यवरांची उपस्थिती
या ग्रंथपूजन कार्यक्रमाला दीपक गद्रे, रुपेश साळवी, सुहास विद्वांस, सौ. प्रभुदेसाई, सौ. दामले, सौ. आठवले, उमेश कुलकर्णी, अर्जुन कुलकर्णी, श्री. लेले सर, वैभव पटवर्धन, सौ. अंकिता पटवर्धन तसेच व्यवस्थापन मंडळ सदस्य व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

