(रत्नागिरी)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली संलग्न मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० अंतर्गत आयोजित “दीक्षारंभ” कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत या कार्यक्रमातून करण्यात आले. विद्यार्थ्यांना शैक्षणिक तसेच सामाजिक-सांस्कृतिक अंगांनी समृद्ध करण्याचा उद्देश या उपक्रमामागे आहे.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अनिल पावसे (सहयोगी अधिष्ठाता, मत्स्य महाविद्यालय, शिरगाव) उपस्थित होते, तर प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताच्या सुरांनी वातावरण भारावून गेले. मान्यवरांच्या हस्ते नव्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
डॉ. पावसे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याचे व आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासण्याचे आवाहन केले. प्राचार्य डॉ. चौधरी यांनी अध्यक्षीय भाषणात मत्स्य अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी व पदविका धारकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर प्रकाश टाकला. त्यांनी विद्यार्थ्यांना “ज्ञान, कौशल्य आणि सकारात्मक वृत्ती” यांच्या आधारे यशाकडे वाटचाल करण्याचा सल्ला दिला.
प्रास्ताविक सत्रात प्राध्यापक व अधिकारी यांच्याकडून विविध विषयांवर माहिती देण्यात आली. डॉ. राकेश जाधव यांनी शैक्षणिक नियमावली व विद्यार्थी परिषदेची माहिती दिली. वसतिगृह प्रमुख श्री. सुशील कांबळे यांनी वसतिगृहातील शिस्त स्पष्ट केली. श्री. निलेश मिरजकर यांनी अभ्यासक्रम रचना सांगितली, तर कार्यालय अधीक्षक श्री. यादव यांनी विद्यापीठ आचारसंहिता व शिस्त यांवर मार्गदर्शन केले. श्रीमती मयुरी डोंगरे यांनी अँटी-रॅगिंग नियमांची सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाअंती चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन झाले. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन श्री. निलेश मिरजकर यांनी केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी मेहनत घेतली. “दीक्षारंभ”मुळे नव्या विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नियमांची ओळख नाही तर उद्योजकता, सामाजिक जबाबदारी, सहकार्य आणि सर्वांगीण विकासाची प्रेरणा मिळाल्याचे प्रतिपादन आयोजकांनी केले.

